Pune News : शेततळ्यात बुडून दोन बहिणींसह ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune News : शेततळ्यात बुडून दोन बहिणींसह ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

Pune News : शेततळ्यात बुडून दोन बहिणींसह ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; आंबेगाव तालुक्यातील घटना

Updated May 24, 2024 08:14 PM IST

Pune News : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे दुपारच्या सुमारास शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

शेततळ्यात बुडून दोन बहिणींसह ४ शाळकरी मुलांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)
शेततळ्यात बुडून दोन बहिणींसह ४ शाळकरी मुलांचा मृत्यू (संग्रहित छायाचित्र)

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या ४ शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या दत्तात्रय वळसे पाटील कृषी फार्मच्या शेततळ्यात ही दुर्घटना घडली.  मृतांमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. या घटनेने निरगुडसर गावावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा काळू नवले (वय १३), सायली काळू नवले (वय ११), दीपक दत्ता मधे (वय ७) राधिका नितीन केदारी (वय १४) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश आहे. शाळेला सुट्टी असल्यामुळे ही चारही मुलं शेततळ्याजवळ खेळत होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास ती पाण्यात उतरली होती, मात्र त्यांना पोहता येत नव्हतं त्यामुळे ती पाण्यात बुडाली.

मूळचे जवळे बाळेश्वर (संगमनेर) येथील कामगार गोरक्षनाथ बबन कवठे हे पत्नी ज्योती तसेच दत्तक मुली श्रद्धा काळू नवले व सायली काळू नवले यांच्यासमवेत निरगुडसर येथे राहून मजुरीचे काम करत होते. तर मूळचे कानेवाडी (ता. खेड) येथील तीन कुटुंबे कामासाठी निरगुडसर येथे आले आहे. सर्वजण पोंदेवाडी येथे शेतात काम करण्यासाठी गेले होते. त्यांची मुले घरीच होती. दुपारच्या सुमारास श्रद्धा नवले, सायली नवले,  दीपक मधे, राधिका केदारी हे चौघे पोहण्यासाठी नजीक असलेल्या शेततळ्यात गेले. शेततळ्यात ५ ते ७ फूट पाणी होते. पोहत असतानाच चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

शेतात पाणी भरत असताना तेरा वर्षाचा सुरज कवठे या मुलाने धावत येऊन चार जण बुडत असल्याची माहिती गिली. त्यानंतर कुटूंबीयांनी शेततळ्याकडे धाव घेतली मात्र तोपर्यंत चारही जणांचा बुडून मृत्यू झाला होता. या चौघांना पाण्याबाहेर काढून तातडीने उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ते उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. श्रद्धा नवले ही इयत्ता सातवीत, सायली नवले ही इयत्ता पाचवीमध्ये, दीपक मधे हा दुसरीत निरगुडसर येथील शाळेत शिकत होते. राधिका केदारी ही पोंदेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकत होती. शाळेला सुट्टी असल्याने ही मुले दुपारच्या वेळी शेततळ्याकडे गेली होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर