Car Accident : समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात माजी रणजीपटू जखमी, पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू
Praveen Hingnikar Car Accident : महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात विदर्भाच्या माजी रणजीपटूच्या पत्नीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Praveen Hingnikar Car Accident On Samruddhi Mahamarg : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भ तसेच मुंबईच्या वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विदर्भाचा माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर यांच्या कारला बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. त्यात प्रवीण यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून प्रवीण हिंगणीकर यांना गंभीर मार लागल्याची माहिती आहे. त्यानंतर आता प्रवीण हिंगणीकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रवीण हिंगणीकर यांच्या कार अपघातामुळं महाराष्ट्रातील क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी विदर्भाचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर हे आपल्या पत्नीसोबत समृद्धी महामार्गावरून प्रवास करत होते. यावेळी भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने प्रवीण यांची कार एका अवजड मालवाहू वाहनाला जाऊन धडकली. त्यात प्रवीण यांच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून प्रवीण यांना गंभीर मार लागला आहे. अपघात इतका भीषण होता की, प्रवीण यांच्या कारचा अक्षरश: चुराडा झाला आहे. कारचा अपघात झाल्याची माहिती समजताच स्थानिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत प्रवीण यांना मेहकर येथील रुग्णालयात दाखल केलं आहे. प्रवीण यांच्या हाता पायाला जखमा असून ते सुखरुप आहेत. परंतु या अपघातात त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Thane Fire : ठाण्यात अग्नितांडव.. सिने वंडर मॉलजवळील इमारतीला भीषण आग, पाहा VIDEO
समृद्धी महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा...
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं म्हणजेच नागपूर ते शिर्डी दरम्याच्या वाहतुकीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं होतं. परंतु वाहतूक सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच समृद्धी महामार्गावर शेकडोंच्या संख्येनं भीषण अपघात झालेले आहेत. अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूर जिल्ह्यातील अनेक पॉईंटवर वाहनांचे अपघात होत असल्यामुळं वाहनचालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. महामार्गाच्या बांधणीत अनेक चुका झालेल्या असल्याच्या तक्रारी वाहनचालकांनी केलेल्या आहे. याशिवाय समृद्धी महामार्गावर अनेक भरधाव वाहनांना स्पीड कंट्रोल होत नसल्यामुळंच अपघात होत असल्याचंही बोललं जात आहे.