मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nirmala Sitharaman : भ्रष्टाचारात राष्ट्रवादीला शंभर पैकी शंभर गुण, निर्मला सीतारामण यांची टीका

Nirmala Sitharaman : भ्रष्टाचारात राष्ट्रवादीला शंभर पैकी शंभर गुण, निर्मला सीतारामण यांची टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2022 09:47 PM IST

भाजपच्या मिशन २०२४ अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनीआज बारामतीचा (Baramati constituency) दौरा केला. बारामती येऊन सीतारामण यांनी देशातील घराणेशाही, भ्रष्टाचार आणि वंशवाद विरोधात रणशिंग फुंकले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

निर्मला सीतारामण यांची राष्ट्रवादीवर टीका
निर्मला सीतारामण यांची राष्ट्रवादीवर टीका

बारामती- भाजपच्या मिशन २०२४ अंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनीआज बारामतीचा (Baramati constituency) दौरा केला. बारामती येऊन सीतारामण यांनी देशातील घराणेशाही, भ्रष्टाचार आणि वंशवाद विरोधात रणशिंग फुंकले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. मात्र,एका मतदारसंघाचा अपवाद सोडल्यास इतर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने कायम प्रश्न चिन्ह आहे. घराणेशाहीतून काका-पुतण्यावाद व त्यातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यासाठी शंभर पैकी शंभर गुण द्यावे लागतील,अशी थेट टीका निर्मला सीतारमण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली आहे. बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

सीतारमण पुढे म्हणल्या, बारामतीमध्ये येऊन भाजपचे संघटन मजबूत करणार आणि हे नाते केवळ निवडणुकीपुरते नसून कायमस्वरूपी राहील अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे. घराणेशाही, भ्रष्टाचार आणि वंशवाद या विरोधात काम करण्यासाठी बारामतीतही भरपूर संधी आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापुढील काळात मतदारांपर्यंत पोहोचत केंद्राच्या सर्व योजना मतदारांना समजून सांगा. एकाच मतदारसंघात होणारी प्रगती दूर करून सर्व मतदारसंघात समान विकास झाला पाहिजे. भाजपचे संघटन मजबूत करण्याचा एक भाग म्हणून माझा बारामती दौरा होता. मात्र,माझ्या बारामतीच्या दौऱ्यामुळे वातावरण गरम होत असल्याचे निदर्शनाला आले. वास्तविक जे चांगले काम करत आहे,ते करत राहा

देशात अनेक वर्षे काँग्रेसने गरिबी हटावचा नारा घेऊन २० कलमी कार्यक्रम आखला होता. मात्र, रायबरेली किंवा अमेठीमध्ये देखील विकासाचे काम होऊ शकलं नाही. मात्र भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये सर्व मतदारसंघात समान विकासाचे सूत्र नजरेसमोर ठेवून सबका विकास हेच ध्येय कायम ठेवत काम सुरू केले आहे,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे कामे सुरु आहे. केंद्राने सर्व केंद्रीय मंत्र्यांना देशातील १४० लोकसभा मतदारसंघात केंद्रीय योजनांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी पाठविले आहे. आणि ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. माझ्याकडे बारामतीसह तेलंगणाच्या एका लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत केंद्रातून कोणतीही तडजोड होणार नाही. कार्यकर्त्यांनी बोगस मतदान थांबवण्यासोबतच समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करावा. जगातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. मात्र,असे सांगण्याची मला आता भीती वाटते. कारण कार्यकर्ते निर्धास्त होतात. या ठिकाणची बूथ बांधणी पक्की करावी. बारामतीमधील प्रलंबित विकासकामांसाठी केंद्राकडून नक्की मदत करू व निधी देऊ,अशी ग्वाही सीतारमण यांनी यावेळी दिली आहे.

शरद पवारांच्या खोचक टीकेला उत्तर -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निर्मला सीतारमण यांची भाषा बारामतीकरांना जरूर समजेल,असा खोचक उल्लेख केला होता. तो धागा पकडून निर्मला सीतारामन यांनी आपण बारामतीकरांशी संवाद साधण्यात यशस्वी ठरल्याचे दाखवून देत त्यांनी उपस्थितांना मी जे बोलते आहे,ते तुम्हाला समजते का,असे जाहीरपणे विचारले. लोकांनीही होय असे उत्तर दिल्यानंतर तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे,असे सांगत दोन्ही हात उंचावून सांगा असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर दोन्ही हात वर करून तुमची भाषा समजत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. अशा पद्धतीने सीतारमण यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खोचक टीकेला उत्तर दिले आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग