स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण.. प्रतापगडावर मशाल उत्सव, ३६३ मशालींचा लखलखाट
प्रतापगडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थीला ३५९ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागील २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या मशाल उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.
सातारा - हिंदवी स्वराज्य स्थापन होऊन आज (गुरुवार) ३६३ वर्षे पूर्ण झाल्याने रात्री ३६३ मशाली पेटवून प्रतापगड व आजूबाजूचा परिसर प्रकाशाने उजळून काढण्यात आला. किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थीला ३५९ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मागील २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या मशाल उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.
हजारो शिवभक्तांनी चौथ्या माळेदिवशी किल्ले प्रतापगडवर ढोल-ताशांच्या गजर आणि फट्याक्यांची आतषबाजीत सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली होती. सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त गडावर आले होते. चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला.
हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी स्वराज्य ढोल-ताशा पथकाच्या गजरात व भगवे झेंडे फडकावित मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांना डोळ्यांत साठवून ठेवला. प्रतापगडावर आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले होते.
संबंधित बातम्या
विभाग