Five People Drowning : बकरी ईद संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान वाशिम व अमरावतीमध्ये बकरी ईदच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील राम नगर पिंपरी फॉरेस्ट परिसरातील अडाण धरणाच्या डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात संध्याकाळच्या सुमारास घडला आहे. अमरावतीमध्येही छत्री तलावातबुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. ऐन ईदच्या दिवशी ही घटना घडल्यानं मृतकांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
वाशिमच्या अडाण धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. बकरी ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी वाशिमच्या कारंजा तालुक्यातील अडाण धरणावर काही तरुण गेले होते. धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तिघांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.
कारंजा शहरातील काही तरुण अडाण धरणावर गेले होते. त्यातील काही तरुणांनाधरणाच्या गेटसमोरील पात्रातील डोहात पोहण्याचा मोह झाला. यात रुणांनी पाण्यात उडी मारली मात्र पाण्याचा अंदाजन आल्यामुळे तिघे जण बुडू लागले. त्यांच्यासोबत असलेल्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
रेहान खान हफीज खान (वय १९ वर्षे), साईम करीम शेख (वय १७ वर्षे), इस्पान अली अर्षद अली (वय १५ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही कारंजामधील भारतीपुरा येथील रहिवाशी होते. या तिघांचेही मृतेदह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मुस्लिम बांधवांचा आनंदाचा सण असताना तीन तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरावर शोककळा पसरली आहे.
अमरावतीमध्येही दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या छत्री तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला. उमेर शेख मेहबुब (वय १७ वर्ष) आणि अयान राजू शाह (वय १९ वर्ष) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. पाच ते सहा तरुण तलावावर पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.बचाव पथकाने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले.
संबंधित बातम्या