Khandala Accident News Today: खंडाळा येथील मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरील बॅटरी हिल वळणावर सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत. सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
लोणावळ्याकडून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणाऱ्या कारवर पलटला.ही कार अलिबागवरून तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. मात्र, रस्त्यातच त्यांच्या कारला अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, दत्तात्रय रामदास चौधरी (वय, ५५) आणि कविता दत्तात्रय चौधरी (वय, ४६) असे मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत. तर, भूमिका दत्तात्रय चौधरी (वय,१६), मितांश दत्तात्रय चौधरी (वय,९), योगेश श्रीराम चौधरी (वय,४०), जान्हवी योगेश चौधरी (वय,३१), दिपंशा योगेश चौधरी (वय,३१) जिगीशा योगेश चौधरी (वय दीड) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघातानंतर अधिकाऱ्याने तातडीने कायदेशीर कार्यवाही सुरू केली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कंटेनरच्या अज्ञात चालकाविरोधात मोटार वाहन कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८ आणि १३४ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
ठाण्याच्या भिवंडी येथे शनिवारी अज्ञात कारच्या धडकेत एका ५२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. हैदरअली अब्दुलजफ्फर अन्सारी असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अन्सारी रस्त्याच्या कडेला बसला असताना एका अज्ञात कारने त्याला धडक दिली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. यानंतर स्थानिक लोकांनी अन्सारी यांना वैद्यकीय उपचारासाठी भिवंडीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये नेले, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
भिवंडीत भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. शहाजाद अहमद अब्दुल खान असे या तरुणाचे नाव असून तो चिकनच्या दुकानात कामाला होता.
संबंधित बातम्या