Maharashtra Politics: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट लोकसभा निवडणूक संपल्यावर एकत्र येऊन भाजपमध्ये सामील होणार, या दाव्यासह साम टीव्हीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला जात आहे. मात्र, या बातमीमागील सत्य तपासले असता व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये केलेले वक्तव्य वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. दोन्ही गट एकत्र आल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही.
व्हायरल स्क्रीनशॉट साम टीव्ही चॅनलचे लोगो आणि ग्राफीक्स दिसत आहे. या स्क्रीनशॉटमध्ये “लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपसोबत जाणार” आणि “उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मत म्हणजे भाजपला मत त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा”, असाही मजकूर पाहायला मिळत आहे.
सर्वप्रथम असा कोणता निर्णय झाला असता तर ही सर्वात बातमी ठरली असती. परंतु, उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येऊन भाजपमध्ये विलिन होणार अशी बातमी कोणत्या माध्यमांवर आढळत नाही. याबाबत तपासणी केली असता व्हायरल स्क्रीनशॉटमधील वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचे समजले. साम टीव्ही चॅनलने १५ मे रोजी आपल्या युट्यूब चॅनलवरून बातमीचा व्हिडिओ अपलोड केला, लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य करत म्हणाले की, निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकत्र आले तर आश्चर्य वाटणार नाही.
साम टीव्हीने १४ मे २०२४ रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या कल्याणमधील सभेतील भाषण थेट प्रक्षेपण केले. या भाषणात प्रकाश आंबेडकर २८:१२ मिनिटांवर बोलतात की, “एकनाथ शिंदेंसोबत ठाकरेंचा समझोता झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर हे दोघे एकत्र आले, तर आश्चर्य वाटायला नको. चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील म्हणाले होते की, जर उद्धव ठारकेंना काही अडचण आल्यास मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही.” पुढे प्रकाश आंबेडकर बोलतात की, “लोकसभा निवडणूक संपल्यावर ठाकरे भाजपसोबत जाणार म्हणून काँग्रेसनेदेखील ठाकरे गटापासून फारकत घेतली आहे.”
प्रकाश आंबेडकारांनी केलेल्या वक्तव्यवर पत्रकारांनी अंबादास दानवेंना प्रतिक्रीया मागितल्यावर त्यांनी सांगितले की, “आमच्या पक्षातून जे निघून गेले त्यांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश मिळणार नाही.” याआधी अनेकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ एकत्र येणार अशा आफवा व्हायरल झाल्या होत्या.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार आणि संपूर्ण शिवसेना भाजपसोबत जातील, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. व्हायरल स्क्रीनशॉट भ्रामक दाव्यासह शेअर केले जात आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये.
संबंधित बातम्या