कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेले समीर वानखेडे राजकारणात येणार, महायुतीकडून निवडणूक लढणार?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेले समीर वानखेडे राजकारणात येणार, महायुतीकडून निवडणूक लढणार?

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात वादग्रस्त ठरलेले समीर वानखेडे राजकारणात येणार, महायुतीकडून निवडणूक लढणार?

Updated Oct 17, 2024 12:14 PM IST

Maharashtra Assembly Election 2024: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे महायुतीकडून विधानसभा लढवणार असल्याची चर्चा आहे.

आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री
आयआरएस अधिकारी समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री

Maharashtra vidhan sabha election 2024: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला अटक करून प्रसिद्धीझोतात आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरणार आहेत.समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील धारावी मतदारसंघातून ते निवडणूक लढवू शकतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, राजकारणात जाण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.

कोण आहेत समीर वानखडे?

समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. त्यांनी २०२१ पर्यंत मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी ते राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत होते. वानखेडे यांनी अमली पदार्थांच्या अंमलबजावणीशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले. छापे, गुप्तचर कारवाया आणि अंमली पदार्थांचे तस्करी रोखण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी आपल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत एकूण १७ हजार किलो अंमली पदार्थ आणि १६५ किलो सोने जप्त केले आहे.

‘या’ प्रकरणांमुळे चर्चेत

- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद टोळीचे ड्रग्जचे संबंध तोडणे

- इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईकविरुद्ध मनी लाँड्रिंगचा खटला

- गायक मिका सिंग कस्टम चोरी प्रकरण

- कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक

धारावी मतदारसंघातून निवडणूक लढवणार 

काँग्रेसच्या विद्यमान खासदार आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. वर्षा गायकवाड यांना आपल्या बहिणीला या जागेवर काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून द्यायची आहे. आता या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर, नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ आणि २९ ऑक्टोबर, अर्जांची छाननी २८ आणि ३० ऑक्टोबर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख अनुक्रमे ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर