Gajanan Kirtikar : उद्धव ठाकरेच खरे गद्दार, त्यांनी शिवसेना संपवली; गजानन किर्तीकरांचा आरोप
Gajanan Kirtikar Live : ज्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीनं लाभ घेतले, त्यांनाच उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागत असल्याचा आरोपही किर्तीकर यांनी केला आहे.
Gajanan Kirtikar On Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीच्या खेडमधून भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता खेडच्या गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थोड्याच वेळात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर हे देखील खेडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार असून त्यांनीच शिवसेना संपवल्याचा आरोप किर्तीकर यांनी केला आहे. त्यामुळं आता यावरून ठाकरे आणि शिंदे गटात राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीच्या खेडमध्ये माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार गजानन किर्तीकर म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना ही फक्त उद्धव ठाकरे यांनीच संपवली आहे. गद्दार म्हणायचं असेल तर उद्धव ठाकरे यांनाच म्हणायला हवं. आज त्यांच्यासोबत कोण उरलं आहे?, असा सवाल करत गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. काही लोकांनी आयुष्यात वेगवेगळ्या पद्धतीनं लाभ घेतले, त्यांनाच उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागत असल्याचंही गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता किर्तीकरांच्या आरोपांमुळं ठाकरे आणि शिंदे गटात मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. यापूर्वी रामदास कदम यांनी देखील उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते.
गद्दार माणसं काय उत्तर देणार?- अंबादास दानवे
शिवसेनेतून बंड करत बाहेर पडलेल्या लोकांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा नाहीये. ते काय आम्हाला करारा जवाब देणार आहेत?, शिंदे गटातील आमदारांमध्ये गद्दारी घुसलेली आहे. त्यामुळं त्यांना जनताच उत्तर देणार असल्याचं सांगत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शिंदे गटावर टीका केली आहे.