Encroachment Action In Lonavala : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने शेकडो अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Encroachment Action In Lonavala : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने शेकडो अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

Encroachment Action In Lonavala : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने शेकडो अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

Jul 03, 2024 11:33 PM IST

Encroachment action in Lonavala : भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल्वे मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

भूशी धरण  परिसरात अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर
भूशी धरण परिसरात अनधिकृत हॉटेल्स व टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

भुशी धरण परिसरात एकाच कुटूंबातील ४ मुले व एक महिलेसह पाच जणांची बुडून मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. या दुर्घटनेचे खापर छोट्या व्यावसायिकांवर फोडत रेल्वे प्रशासनाने येथील शेकडो दुकाने भुईसपाट केली आहेत. यामुळे स्थानिक लोकांची रोजीरोटी हिरावून घेतली आहे. या दुकानांपासून जवळपास २  किलोमीटर दूर धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात रविवारी झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अतिक्रमाण हटवायला सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या कारवाईचा स्थानिक व्यावसायिकांनी विरोध केला. भुशी धरण परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. भुशी डॅम दुर्घटनेनंतर लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल्वे मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली आहे.

भुशी डॅम परिसरात खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या अनेक टपऱ्या आहेत. या सर्व टपऱ्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. लोणावळामध्ये दोन कुटूंबे वाहून गेल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर २४ तासांच्या आतच प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अवैध अतिक्रमण हटवण्यास सुरूवात केली आहे.

भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत, म्हणून प्रशासनाने तातडीने ही कारवाई हाती घेतली आहे. भुशी धरण परिसरात चहा, नाष्टा, भजी विक्रेते, फेरीवाले, कणीस विक्रेते यांनी दुकाने थाटली होती. त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. या कारवाईवेळी रेल्वे पोलीस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

लोणावळ्यातील पर्यटन स्थळ असलेलं भुशी धरण हे ओव्हरफ्लो झाल्याने पुणे आणि मुंबई यासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटक येथे गर्दी करत आहेत. मात्र या ठिकाणी अतिक्रमणामुळे मोठी गर्दी होत आहे. लोणावळ्यातील धबधब्यात एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्यानंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यामध्ये आमची काय चूक?

स्थानिक व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, जूनपासून पुढच्या तीन-चार महिन्यात व्यवसाय करण्यासाठी व्यापारी संपूर्ण वर्ष वाट पाहतात व तयारी करतात. यासाठी अनेक लोक आपले सोने व अन्य संपत्ती गहाण ठेऊन, उच्च व्याज दराने पैसे घेऊन भांडवल जमा करतात. हे पैसे ते व्यवसाय करून परत करतात. मात्र मंगळवारी या कारवाईने त्यांचा व्यवसाय अचानक बंद करण्यात आला आहे. यामुळे ते आर्थिक संकटात सापडले आहेत.

नोटीस न देताच कारवाई -

कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटीस न देता रेल्वे प्रशासनाने लोणावळा नगर परिषद आणि पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत दुकाने हटवली. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

प्रशासनाकडून पर्यटकांसाठी नियमावली -

लोणवळ्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळी ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती आहे. लोणावळ्यातील प्रसिध्द असलेला लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट आणि शिवलिंग पॉइंट या ठिकाणी संध्याकाळी ६ पर्यंतच पर्यटकांना जाण्यास परवानगी असणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर या पर्यटनस्थळी जाण्यासाठी पर्यटकांना बंदी असणार आहे. नियमांचे उल्लघन करणा-यांविरोधात कारवाई देखील केली जाणार आहे. लोणवळ्यातील  अनेक धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर