Eknath Shinde: बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांचे संरक्षण काढले; एकनाथ शिंदे भडकले!
Eknath Shinde Letter to CM: शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या काही आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढल्यामुळं एकनाथ शिंदे भडकले आहेत.
Eknath Shinde Vs Shiv Sena: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेचे बंडखोर माघार घेणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता महाविकास आघाडीनं नव्या चाली खेळण्यास सुरुवात केली आहे. बंडाळीमुळं शिवसैनिकांमध्ये संताप असतानाच बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांचं पोलीस संरक्षण काढून घेण्यात आलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे भडकले आहेत. त्यांनी ट्वीट करत सरकारला इशारा दिला आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना पत्र लिहिलं आहे. राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचं संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशानं काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे, असं शिंदे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. शिंदे यांच्या पत्राखाली १६ आमदारांच्या सह्या आहेत.
शिंदे पत्रात काय म्हणतात?
- आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण काढून घेण्याचा निर्णय बेकायदेशीर आहे. हा सूडभावनेनं घेतलेला निर्णय आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या गुंडांना आम्ही शरण यावं म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.
- आम्ही कोणत्या पक्षाचे किंवा राजकीय विचारधारेचे आहोत हे पाहून आम्हाला संरक्षण देण्यात आलं नव्हतं. आम्हाला असलेला धोका पाहून ते देण्यात आलेलं होतं. ज्या भीतीनं आम्हाला महाराष्ट्र सोडावा लागला, ती खरी ठरली आहे. हा निर्णय घेऊन सरकारनं दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे.
- सरकारच्या या निर्णयामुळं आमच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला आहेच, पण महाविकास आघाडीनं त्यांच्या कार्यकर्त्यांना हिंसाचारासाठी एक प्रकारे चिथावणी दिली आहे.
- संजय राऊत यांनी आधीच आमदारांना महाराष्ट्रात येऊन दाखवा, तुम्हाला फिरू देणार नाही अशी धमकी दिली आहे. त्याचे पडसाद उमटत आहेत. संरक्षण काढून घेताच शिवसैनिकांनी आमच्या दोन सहकारी आमदारांच्या कार्यालयावर हल्ला केला आहे.
- पंजाबमध्ये अलीकडंच काही महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा सरकारनं काढून घेतल्यानंतर त्यांना गँगस्टर्सनी लक्ष्य केलं होतं. महाराष्ट्रातही आमच्या सहकाऱ्यांच्या बाबतीत तसे अनुचित प्रकार घडू शकतात.
- आमच्या कुटुंबीयांना व नातलगांना पूर्वीप्रमाणेच प्रोटोकॉलनुसार सुरक्षा दिली जावी, अशी आमची मागणी आहे. आमच्या कुटुंबीयांच्या जिवाला कुठलाही धोका उद्भवल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, संजय राऊत व आदित्य ठाकरे हे जबाबदार असतील.