Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दाओस दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, राज्यात पालकमंत्री पदावरून मोठं नाराजीनाट्य सुरू झालं आहे. राज्यातील पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यापासून महायुतीतील धुसफूस पुढे आली आहे. ही यादी करतांना शिंदे यांच्या शिवसेनेला भाजपने फारसे महत्व दिलं नसल्याचं पुन्हा एकदा पुढं आलं असून यामुळे नाराज एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या गावी निघून गेले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची धावपळ सुरू आहे.
राज्यात पालकमंत्री पदाची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. मात्र, यात नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे शिंदे गटात नाराजी पसरली होती. या यादीचा उघड विरोध करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांना बोलून दाखवली. दरम्यान, नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपदाची नियुक्ती स्थगित करण्यात आली असली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेले आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी दादा भुसे आग्रही असतांना या दोन्ही नेत्यांना डावलण्यात आले. यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असून त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली. यानंतर ते थेट दरेगावी गेले आहेत. .
शिंदे यांच्या नाराजीवर विरोधकांनी भाजपवर टीका केली आहे. शिंदे यांची गरज संपली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, नाराजी दाखवून आपल्या पदरात काही मिळेल का ? असा प्रयत्न शिंदे यांचा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परिस्थिती बिकट असून त्यांची गरज संपली आहे. उद्धव ठाकरे यांना संपून शिंदेंना आणलं. तर आता शिंदेंना संपून नवीन 'उदय' पुढे आणला जाईल, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. राज्यात सध्या सावळा गोंधळ सुरू आहे. बहुमत असताना आपसात मतभेद वाढले असून सत्तेसाठी पैसे मिळवण्याची स्पर्धा महायुतीत सुरू आहे. आज पालकमंत्री बदलला आहे, तर परवा उपमुख्यमंत्री बदलायची वेळ येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने ते त्यांच्या दरे गावात निघून गेले आहे. सध्या त्यांची मनधरणी करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन दरे गावाला गेल्याची माहिती आहे. आधी शपथविधी होतं नव्हता. त्यानंतर मंत्री कोण होणार यावरून वाद सुरू झाले. तर आता पालकमंत्री पदावरून धुसफूस सुरु आहे. बहुमतअसताना देखील पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली हे लाजिरवणे आहे. एकनाथ शिंदे अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी कुंभमेळ्यात जावं. आयआयटीवाले बाबा पाहिले आता आपण दरेगाववाले बाबा पाहू, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. सध्या त्यांच्या नाराजीचे कारण काय आहे? का वेळोवेळी हे नाराज होतात? रूसू बाई रूसू, कोपऱ्यात जाऊन बसू हे काय चालले आहे? एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करताना मुख्यमंत्रीपदासाठी रुसले होते, तेव्हा 'उदय' होणार होता. दावोसला उदय सामंत यांच्यासोबत २० आमदार गेले आहेत अशी माहिती असल्याचे राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या