Shivsena foundation day : ठाकरे गटाला मुंबईत कुणाची मतं पडली हे जगजाहीर झालं आहे. त्यांच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे हिरवे झेंडे फडकत होते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना स्थापना दिनाच्या कार्यक्रमातून केला आहे. वरळीतून यांना जेमतेम सहा हजारांचे लीड मिळालं आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना आता भेंडी बाजारसारखा मतदारसंघ शोधावा लागणार असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
या लोकसभा निवडणुकीने शिवसेना कुणाची याचा निकालही जनतेने दिला आहे. दोन वर्षांपूर्वी जो आपण उठाव केला. त्यावर जनतेने खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब केले आहे. आपण घेतलेला निर्णय कसा योग्य होता ते समोर आले आहे. त्यामुळे'बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार त्यांना राहिला नाही. बाळासाहेबांचा फोटो लावून मत घेण्याचा अधिकार देखील त्यांना राहिला नाही.'अशी टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केली आहे.
मुंबईतउद्धव ठाकरे यांच्यापेक्षा सव्वा दोन लाख मतदान आपल्याला जास्त पडल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. कोणी म्हणाले ठाणे पडेल,कल्याण पडेल. पण ठाणे-कल्याण २ लाखांच्या मताधिक्याने आम्ही जिंकले. संभाजीनगर देखील जिंकले. कोकणात एकही जागा उबाठ्याला मिळू शकली नाही. आपण हा विजय घासून पूसन नाही तर ठासून मिळवला आहे. शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्यासोबत आहे. धनुष्यबाणासोबत आहे. त्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे.शिवसेनेचे १९ टक्के मतदार होते, त्यापैकी १४.५ टक्के मतदार हे आमच्या शिवसेनेकडे आले आणि साडेचार टक्के मते तिकडे राहिली. मग इतर मते कशी आली, कुठून आली, त्यांचे उमेदवार कसे जिंकले हे महाराष्ट्राला माहिती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती काही काळाने उतरते, असा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला.
उद्धव ठाकरेंना मतं मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले हे सांगायला नको. ओवैसीपेक्षा आता उद्धव ठाकरे हेच आपला मसिहा असल्याचं त्यांना वाटायला लागलंय. वरळीमध्ये ठाकरे गटाला फक्त सहा हजारांचं लीड मिळालंय. काही म्हणत होते या ठिकाणी ५० हजारांचं लीड घेणार. राजीनामा देणारे कुठे गेले.आता कसे जिंकणार? तुम्हाला भेडींबाजारसारखा एरिया शोधला पाहिजे. हिंदू हिंदूंचे शत्रू ठरतील,असं बाळासाहेब म्हणत होते,आता तेच होत आहे. आम्ही अल्पसंख्याकांच्या विरोधात कधीच नाही, पण बाळासाहेबांचा विरोध तुष्टीकरणाला होता.
लोकसभेच्या आणखी ३ ते ४ जागा नक्की आपण जिंकलो असतो. त्या आपण कशामुळे गमावल्या, तेआपल्या सर्वांना माहिती आहे,त्यात मी जाऊ इच्छित नाही, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केल. मी महायुतीचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझ्यावर जास्त जबाबदारी आहे. महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायाची आहे असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या