Eknath Shinde : संजय राऊतांचं नवं ट्विट, बंडखोर आमदारांना राऊतांचं आव्हान
आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट (Tweet) केलं आहे. या ट्विटमधून संजय राऊत यांनी या बंडखोरांना थेट आव्हानच दिलं आहे.
Maharashtra Politics Update : गेले सहा दिवस राज्यात शिवसेनेतल्या (Shiv Sena) बंडखोर आमदारांवर एकीकडे कारवाईची मागणी होत असताना आता मात्र गेले सहा दिवस शांत असणाऱ्या शिवसैनिकांचा (Shiv Sena Party Workers) संयम आता सुटू लागल्याचं चित्र आहे. एकीकडे नाराज शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ले होत आहेत. तिथेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कायदेशीरदृष्ट्या या पेचातन मार्ग काढण्याच्या हालाचाली सुरु केल्या आहेत.
राज्यात एकीकडे सर्वत्र राजकीय धुरळा उडालेला पाहायला मिळत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांकडून आता मात्र बंडखोर आमदारांना आव्हान देण्याची भाषा वापरली जात असल्याचं पाहायला मिळू लागलं आहे. आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून संजय राऊत यांनी या बंडखोरांना थेट आव्हानच दिलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी प्रभारी विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाल यांचा फोटो वापरला आहे. त्याखाली संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना आव्हान देत हिंदीमध्ये दोन ओळी वापरल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी "कबतक छिपोगे गोहातीमें, आनाही पडेगा चौपाटीमें" असं म्हणत थेट मुंबईत येण्याचं आव्हान केलं आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनं आता शिवसेनेचा जुना आक्रमक चेहरा पाहायला मिळत आहे
त्या आधी शनिवारी रात्री आदित्य ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. मुंबईच्या लाला लजपतराय महाविद्यालयात झालेल्या एका सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे यांनी एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जात असल्याचं म्हणत बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं होतं. आमच्याकडे आता जे कार्यकर्ते आहेत ते आता आमचे विजयाचे नवे उमेदवार असतील असं आदित्य ठाकरे म्हणालेत.ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी आधी राजनामे द्यावेत, राजीनामे दिल्यावर निवडणूक जिंकून दाखवावी, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आता शिवसेना या बंडखोरांना माफ करणार नाही असं सांगतनाच आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना एक निर्वाणीचा इशाराही दिला आहे. भाजपची नजर मुंबई महापालिकेवर आहे. एअरपोर्ट ते विधानसभेचा रस्ता वरळीतून जातो हे विसरू नका. बहुमत सिद्ध करण्यासाठी सर्वांना येथून जावे लागेल असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.