Ramdas Kadam: नुसती दाढी वाढवून काय फायदा; लग्न तर करून बघा, रामदास कदमांची आदित्य ठाकरेंवर टीका
Ramdas Kadam Criticised Aditya Thackery : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काल दापोली येथे मेळावा घेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला बोल केला.
दापोली : आदित्य ठाकरे यांनाच १०० खोके घ्यायची सवय आहे. ते काय माझ्या १०० खोक्यांची पोल खोल करणार. मीच त्यांची पोळखोल करणार आहे. मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात खोके जायचे. आदित्य ठाकरे नुसते 'खोके-खोके' बोलत सगळीकडे टुणटुण उड्या मारत आहेत. पण आदित्य ठाकरे यांनी लग्न करून पाहावं, म्हणजे त्यांना संसार काय असतो ते कळेल. नुसती दाढी वाढवून फायदा नाही, एकदा लग्न करुन बघा, अशी जहरी टीका रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे मेळावा घेत कदम यांच्यावर टीका केली होती. या टीकेला त्यांनी चोख उत्तर दिले आहे.
दापोली इथे रविवारी शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी रामदास कदम यांनी ठाकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी दापोली येथे सभा घेत रामदास कदम यांच्यावर मोठे आरोप केले होते. या सर्व आरोपांचा समाचार रामदास कदम यांनी या मेळाव्यात बोलतांना घेतला.
रामदास कदम म्हणाले, काका म्हणत अडीच वर्ष माझ्याकडून काम समजून घेतले आणि नंतर काकाच्याच पाठीत खंजीर खुपसला. बाळासाहेब ठाकरे यांनी जे कमावलं ते उद्धव ठाकरे यांनी गमावले. ज्या वेळेल राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युतीचा निर्णय झाला तेव्हा मातोश्रीवर बैठक झाली होती. त्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा मी बैठकीतून उठून बाहेर आलो. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मी म्हणालो की, बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेसशी संघर्ष करण्यात घालवले. त्यामुळे तुम्ही आता राष्ट्रवादीसोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ नका. अशाने बाळासाहेबांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही. त्यानंतर मी तिथून निघून गेलो. तेव्हापासून मी मातोश्रीची पायरी चढलेलो नाही आणि आयुष्यात चढणारही नाही. रामदास कदम यांनी शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा ‘चिपळूणचा नाच्या’ असा उल्लेख करत त्यांच्यावरही जोरदार टीका केली.
संबंधित बातम्या