डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात एका केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत जखमींच्या संख्येसह मृत्यूचा आकडाही वाढला आहे.या भीषण स्फोटात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत ६० हून अधिक गंभीर जखमी आहेत.दरम्यान या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील ज्या कंपनीत स्फोट झाला त्या कंपनीत बॉयलरला परवानगीच देण्यात आली नसल्याची माहिती कामगार विभागाने दिली आहे. राज्याच्या कामगार विभागाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.
या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
कामगार विभागाने बॉयलरबाबत माहिती देताना सांगितलं आहे की,डोंबिवलीतीलकारखान्यात स्फोट झाला व त्यामुळे लागलेल्या आगीमुळे कारखाना व परिसरातील इतर कारखाने आणि इमारतींचे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे काम शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात येत आहे. या कारखान्यामध्ये कोणत्याही बॉयलरची नोंदणी भारतीय बाष्पके विनियम,१९५० अंतर्गत या विभागाद्वारे करण्यात आलेली नाही. या कारखान्यात कोणताही नोंदणीकृत बॉयलर कार्यरत नव्हता. कारखान्यातील स्फोटाच्या कारणांबाबतची माहिती सखोल चौकशी अंती देण्यात येईल.
हा स्फोट इतका भीषण होता की, डोंबिवली व आजूबाजूच्या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले. हवेत धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. ३ ते ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ४ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. या कंपनीच्या जवळ असलेले हुदांई गाड्यांचे शोरूम जळाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
उदय सामंत म्हणाले की, डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर शिफ्ट केल्या जातील. आचारसंहिता संपल्यावर म्हणजे ४ जूननंतर डोंबिवलीतील कंपन्यांचे वर्गीकरण केले जाईल. तसेच धोकादायक कंपन्या शहराबाहेर शिफ्ट केल्या जातील. वर्षभर यावर काम सुरू होते. जागा शोधली आहे, मात्र जागेचे वाटप अद्याप केलेले नाही. ४ जूननंतर जागेचे वाटप करण्यात येईल.
सामंत म्हणाले की, या केमिकल कंपन्यांमध्ये नियमबाह्य काही झालं आहे का? याची तपासणी करण्याच्या सूचना अग्निशमन दलाला दिल्या आहेत. तसंच या घटनेची सखोल चौकशीही केली जाणार असून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या