बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असून यावरूनआरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे लोण आला अन्य जिल्ह्यात पसरले जात असून राज्यभरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. धाराशीव येथे आज काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. मराठ्यांनी पुढच्या काळात सावध राहा, काळ चालुन आला आहे, बेसावध राहाल तर मारले जाल, असं म्हणत जरांगे पाटलांनी समाजाला आवाहन केलं.
मनोज जरांगे म्हणाले, धनंजय मुंडे हा मनोज जरांगे कोणाला भीत नसतो, मी धमक्यांना उडवून लावतो. तुझ्या गुंडांना शांत कर. जर तुझ्यामुळे मराठा, दलित मुस्लिम ओबीसीला त्रास झाला तर २५ जानेवारीनंतर तुझी मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही. तुझी टोळी थांबव, ही धमकी नाही, तर तुला सावध करतोय. असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना देत जोरदार तोफ डागली.
आपली पापंझाकण्यासाठी तो ओबीसींचे पांघरुन घेतोय. यात ओबीसींचा काय संबंध आहे? वंजारी, धनगर, दलित कोणाला बोललो नाही, गुंडांना बोलायचं नाही का? धनंजय मुंडे ओबीसी काढायला सांगतोय. मुंडे, तुमच्या घरचे कुणी मेल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुम्ही असाच त्रास दिला तर मराठ्यांना उठाव करावाच लागेल.ओबीसींचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असशील, तर लक्षात ठेव वेळ प्रत्येकावर येते, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मी देशमुख आणि सूर्यवंशी कुटूंबाला न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. सर्व खंडणीचे आरोपी ३०२ मध्ये आले पाहिजे. तसेच आरोपींना सांभाळणाऱ्यांना सहआरोपी केले पाहिजे, अशी मागणीही जरांगे यांनी केली.
जरांगे म्हणाले, माझ्यावर जातीयवादीचा आरोप केला जातो. आम्ही कधीच तुझ्या जातीवर बोललो नाही,आम्ही कायम गुंडावर बोललोय आणि बोलत राहणार. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे म्हणून मराठा समाज शांत आहे. मी जातीवाद करत नाही. पण, मराठ्यांना न्याय मागताना, संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना, कोणाला जातीवाद वाटत असेल, तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही.
संबंधित बातम्या