राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पित्ताशयाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मुंबईतील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. मुंडे यांना गेल्या अनेक दिवसांपासून पित्त व पोटदुखीचा त्रास होता. मात्र सतत दौरे, सभा, कामकाज यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होत होते.मात्र, हा पोटदुखीचा त्रास वाढल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
मुंबईच्या गिरगाव भागातील सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात मुंडेंच्या पित्ताशयावर (gall bladder) डॉ. अमित मायदेव यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. बुधवारी (२४ जुलै) त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (२६ जुलै) त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर धनंजय मुंडे यांची प्रकृती आता स्थिर असून, डॉक्टरांनी त्यांना पुढील चार ते पाच दिवस रुग्णालयातच विश्रांती तसेच पुढील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.
मागील काही दिवसांपासून पित्ताशयाचा त्रास त्यांना होत असल्याने गिरगावातील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आले होते. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असून पित्ताशयाची पिशवी काढण्यात आली आहे. दरम्यान, मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडेंच्या तब्येतीची दूरध्वनीवरून विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह माजी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी देखील रुग्णालयात बंधू धनंजय मुंडे यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आहे.
१० -१५ वर्षापूर्वी धनंजय मुंडे यांना पक्षात घेणे आमचा आत्मघातकी निर्णय होता, असे खळबळजनक विधान जयंत पाटील यांनी केले आहे. मुंडे यांना पाठवून अजित पवारांना भाजपमध्ये आणण्याचा प्लॅन भाजप आणि आरएसएसचा होता का? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सध्या जे राजकारण करत आहे,असे राजकारण कधीच केले नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षात घेणे आमचाच आत्मघातकी प्लॅन होता,असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
संबंधित बातम्या