Haryana assembly election results : हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले व भाजपने अनपेक्षितपणे तिसऱ्यांदा विजय मिळवला. भाजपने गेल्या विधानसभेपेक्षा सरस कामगिरी केली आहे. हरयाणाच्या निकालाने उत्साह वाढलेल्या भाजपने मुंबईत ‘हरयाणा झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ ची बॅनरबाजी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत विजयाचं सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीसांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवले आहे. यावेळी, नाव न घेता त्यांनी शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना खासदार संजय राऊत दररोज पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकार व केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधतात. त्याचबरोबर दैनिक घडामोडी व नेतेमंडळींच्या वक्तव्यावरुन ते भाजप व शिवसेना शिंदे गटावर टीका करतात असतात.
हरियाणा व जम्मू काश्मीर निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. झारखंडमध्ये भाजपचा पराभव झाला असता, तर संजय राऊतांनी त्यांच्या स्टाईलने भाजपवर टीका केली असते. त्यावरुनच, आता निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
फडणवीस म्हणाले की, लोकसभेची निवडणूक आम्ही विरोधी पक्षाकडून हरलो नाही. कुठल्याच विरोधी पक्षामध्ये आम्हाला हरवण्याची ताकद नव्हती. आम्हाला हरवले ते चौथा पक्ष होता, तो म्हणजे फेक नरेटिव्ह! त्या फेक नरेटिव्हने आम्हाला पराभूत केले. पहिली कसोटी हरयाणा, जम्मू काश्मिरमध्ये होती. हरयाणामध्ये तर महाविकास आघाडीचे लोक आज काय बोलायचे ते रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते.
सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलू आणि काय काय नको, असं त्याला वाटतं होतं, अशा शब्दात फडणवीसांनी राऊतांवर नाव न घेता हल्ला चढवला. मात्र मला त्यांना विचारायचंय, आता कसं वाटतंय? जे हरयाणामध्ये घडले, तेच महाराष्ट्रामध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं आपल्याला पाहायला मिळेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या