मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Devendra Fadanvis : उद्धव ठाकरेंनी इगोमुळे मेट्रो कारशेडचे काम थांबवले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Devendra Fadanvis : उद्धव ठाकरेंनी इगोमुळे मेट्रो कारशेडचे काम थांबवले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jul 22, 2022 10:34 AM IST

Mumbai Metro Aarey Carshed पर्यावरणाचा विचार करून या मेट्रो करशेडची उभारणी करण्यात येत होती. ठाकरे सरकारने नेमलेल्या सौनीक कमीटीनेही मेट्रो करशेड प्रकल्प कांजुरला नेणे शक्य नसल्याचा अहवाल दिला असतांनाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केवळ इगोमुळे मेट्रो कारशेडचे काम थांबवले होते, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे

मुंबई : मुंबई मेट्रोचा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही अभ्यास केला होता. या प्रकल्पाला सर्वाेच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती. तसेच कांजुर येथील जागा प्रकल्पासाठी योग्य नाही अशी या संदर्भात नेमलेल्या समितीने  सांगिलते होते. एवढेच नाही तर महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या सौनिक समितीने हा प्रकल्प कांजुरला नेणे चूकीचे ठरेल यासाठी आरेची जागाच योग्य आहे असा अहवाल दिल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरए येथील मेट्रो कारशेडला त्यांच्या इगोमुळे स्थगिती दिलीअसा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गणेशोत्सवाच्या नियोजना संदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

फडणवीस म्हणाले, या पूर्वी ज्या पर्यावरणवाद्यानी मेट्रो कारशेड विरोधात आंदोलन केले ते उच्च न्यायालयात गेले. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. यानंतर ते एनजीटीत गेले एनजीटीनेही त्यांच्या विरोधात निर्णय दिला. या नंतर ते सर्वाेच्च न्यायालयात गेले. सर्वाेच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये हे लिहिले आहे की जी झाडी आपण कापली ती त्यांच्या आयुष्यात जेवढे कार्बन कमी करतील तेवढे कार्बन ही मेट्रो ८० दिवसांत करणार आहे. आम्ही सुद्धा हेच सांगत होतो. या मेट्रोमुळे जवळपास २ लाख मेट्रीक टन एवढे कार्बन उत्सर्जन थांबवणार आहोत. त्यामुळे या मेट्रोला एक एक दिवस उशीर करण म्हणजे एक एका मुंबईकरांना प्रदुषणाच्या माध्यमातून त्यांचे आयुष्य कमी करण आहे. या देशात सर्वाेच्च न्यायालयापेक्षा मोठे कुणी नाही. सर्वाेच्य न्यायालयाच्या निर्णयानंतर काम सुरू झाले. या काळात कुठलाही विरोध नव्हता. २५ टक्के काम पूर्ण झाले. आणि त्यानंतर हे काम बंद करण्यात आले. आम्ही पर्यावरण वाद्यांचा आदर करतो. त्यांनी त्यांचे म्हणने मांडावे. जर सर्वाेच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर मेट्रोचे काम कुणी थांबवण्याचा प्रयत्न करत असेल तर मग त्यामागे सद्हेतू आहे का असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांच्या बाजूने विचार करत हा निर्णय घेतला आहे.

फडणवीस म्हणाले, जर हे काम वेगाने पूर्ण केले तर जे लोक रोज लोकलमधून प्रवास करतात गुदमरतात किंबहूना मरतात. त्यांना या मेट्रोमुळे ४० किलोमिटरची लाईफ लाईन मिळणार आहे. त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबईला प्रदुषणापासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे हा निर्णय अतिशय योग्य पद्धतीने घेतला गेला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, या मेट्रो कारशेडची आरेच्या जागे संदर्भात सर्वात पहिला निर्णय हा पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने घेतला होता. आम्ही तो कायम ठेवत हा प्रकल्प जायकाकडे  नेला. तेव्हा त्यावेळी हा प्रकल्प कांजुरला नेण्यासंदर्भात आमच्याकडे मागणी आली होती. यावर विचार करण्यासाठी आम्ही नितीन  करीर या सारख्या अनेक तज्ञांची समिती नेमली. तेव्हा त्यांनी हा प्रकल्प दुसरीकडे हलवणे सोपे नसल्याचे सांगितले. त्यानंतर आम्ही कोर्टात गेलो. आणि आरेची जागा अंतिम  केली. त्यानंतर ठाकरे सरकार आले. त्यांनी सौनिक कमिटी नेमली त्यानी सुद्धा मेट्रोकारशेड हे कांजुरला नेणे  शक्य होणार नाही. जर नेले तर ४ वर्षे काम होणार नाही.  तसेच प्रकल्पाची किमंतही २० हजार कोटींनी वाढेल २२ हजार कोटीचा प्रकल्प त्याला २० हजार कोटी वाढीव खर्च त्यात तो प्रकल्प ४ वर्ष होणार नाही, असे ठाकरे यांनी नेमलेल्या समितीने सांगितले असतांना केवळ इगो करता हा निर्णय घेतला होता. मुंबईकरांसाठी घेतलेला नव्हता.

कार शेडचा पर्यावरणाबाबतचा सर्व अभ्यास झाला आहे. जर पर्यावरणाची काळजी असती तर मिठी नदीवर जे अतिक्रमण झाले आहे ते त्यांनी रोखले असते. या अतिक्रमणामुळेच हा पूर येतो आहे. त्यावर जर लक्ष ठेवले असते तर ही परिस्थीती आली नसती, असा टोलाही फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या मेट्रोतून १७ लाख प्रवासी प्रवास करणार आहे. पर्यावरण समतोलाचाही विचार करण्यात आला आहे. जर या प्रकल्पाला विलंब झाला तर कोट्यवधी खर्च वाढणार आहे. प्रकल्पासाठी घेतलेल्या आंतराष्ट्रीय कर्जावरही परिणाम होणार आहे.

IPL_Entry_Point