Devendra Fadnavis on PFI : पीएफआय ‘सायलंट किलर’, बंदी योग्यच; देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
Devendra Fadnavis on PFI : देशविघातक आणि समाजात अस्थिरता निर्माण करण्याच्या कारवाया केल्या बद्दल देशभरात पीएफआयच्या कार्यालयांवर राष्ट्रीय तपास यंत्रनांनी छापे टाकले. या नंतर आज केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत या संघटनेवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बंदीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. याबाबत गृहमंत्रालयाकडे तपास यंत्रणांनी शिफारस केली होती. या शिफारसीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पाच वर्षांच्या बंदीचा निर्णय घेतला. या बंदीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रीया दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या संघटनेला सायलंट किलर म्हटले आहे. या बंदी नंतर राज्यांना देखील अधिकृत सूचना दिली जाणार असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.
गेल्या आठवड्याभरात केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयच्या देशभरातील अनेक कार्यालयांवर छापे टाकण्यात आले होते. एनआयए, ईडीसह तपास यंत्रणांनी कारवाई केली होती. पीएफआयशिवाय आणखी काही संघटनांवरही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. या करवाईवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पीएफआयविरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे उपलब्ध आहेत. देशात गैरकृत्य करण्यासाठी या संघटनेने आर्थिक यंत्रणा तयार केली होती. या माध्यमातून टेरर फडिंग देखील केले जायचे. पीएफआय देशात देशात दुष्प्रचार करत होती. त्यांचा देशात मोठ्या प्रमाणात हल्ले करण्याचा इरादा होता. पीएफआय ‘सायलंट किलर’ असल्याचेही देखील फडणवीस म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, मोठ्या प्रमाणात खोटी खाती उघडून त्या माध्यमातून कुणाला संशय येऊ नये, यासाठी थोडे पैसे जमा केले जात होते. देशात गैरकृत्य करण्यासाठी ही आर्थिक यंत्रणा तयार करण्यात आली होती. देशभरात करण्यात आलेल्या छापेमारीत या बाबत मोठ्या प्रमाणात पुरावे आढळले आहेत. त्यामुळेच या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. या बंदीसंदर्भात लवकरच राज्यांना अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. यानुसार पीएफआय आणि संबंधित सहा संघटनांवर कारवाई करू असे देखील फडणवीस म्हणाले.
देशातील उत्तर-पूर्व भागात मशीद तोडल्याच्या खोट्या प्रचारानंतर राज्यात तीव्र आंदोलन आणि तोडफोड झाली होती. ही खोटी माहिती पसारवण्यात पीएफआयचा मोठा हात होता. सीमी या दहशतवादी संघटनेवर बंदी घातल्यावर त्यांनी पीफआय संघटनेची स्थापना केली होती. त्या माध्यमातून गैरकृत्य केले जात होते असे देखील फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या
विभाग