शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाळीला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधक हा दिवस गद्दार दिन म्हणून साजरा करत आहेत तर शिंदे गटाकडून हा दिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा केला गेला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार सत्तेवर आले. त्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या आहेत. आता या बंडाबाबतदीपक केसरकर यांनी मोठा खळबळजनक खुलासा केला आहे.
वर्षापूर्वी केलेले बंड जर यशस्वी झाले नसते तर एकनाथ शिंदे स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून घेणार होते, असा धक्कादायक खुलासा केसरकर यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील उठावाबाबत बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होते की, माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही असं वाटायला लागलं असतं, तेव्हा मी एकच गोष्ट केली असती. माझ्यासोबत आलेल्या सर्व आमदारांना परत पाठवून दिलं असतं. मी एक फोन केला असता की माझी चूक झाली आहे, पण या लोकांची काही चूक नाही आणि तिथेच मी माझ्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं. एक वर्षानंतर दीपक केसरकर यांनी या बंडाबाबत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड फसले असते तर त्यांनी स्वत:ला संपवलं असतं, असं केसरकर म्हणाले.
दीपक केसरकर म्हणाले, असं विधान करणारा माणूस कोणत्या दर्जाचा असतो, कशा प्रकारची माणुसकी त्याच्याकडे असते?प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल पण माझ्यामुळे एकाही आमदाराचं राजकीय नुकसान होता कामा नये, असे म्हणणाऱ्या माणसामागे लोकं उभी नाही राहणार तर कोणाच्या पाठीमागे उभे राहणार असेही ते म्हणाले.
केसरकर म्हणाले, कधी काळी शरद पवार यांनीही बंड केले होते ना? मग पवारांनी केला तो उठाव आणि शिंदेंनी केली ती गद्दारी कशी? मंत्र्यांना भेट मिळत नव्हती, ते काय राजे होते का? तुम्ही तुमच्या घरी राजे, त्यांनी गद्दार बोलणं हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
संबंधित बातम्या