Dahihandi: गोविंदांना 'विमा' सुरक्षा; मनसेसह भाजपनेसुद्धा योजना केली जाहीर
अनेकदा दहीहंडीवेळी दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी होतात. तसंच मृत्यूमुखी पडतात. आता अशी एखादी दुर्घटना घडली तर त्यांना मनसे आणि भाजपकडून विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.
Dahihandi2022: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून दहीहंडी साजरी करता आली नव्हती. मात्र यावेळी दहीहंडीवरचे सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. याशिवाय सार्वजनिक सुट्टीही जाहीर केली आहे. राज्यात विशेषत: मुंबईत दहीहंडी जल्लोषात साजरी केली जाते. यामध्ये गोविदांच्या सुरक्षेचा मुद्दा दरवर्षी उपस्थित केला जातो. अनेकदा दहीहंडीवेळी दुर्घटनांमध्ये गोविंदा जखमी होतात. तसंच मृत्यूमुखी पडतात. आता अशी एखादी दुर्घटना घडली तर त्यांना मनसे आणि भाजपकडून विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.
मनसेकडून गोविंदांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा कवच म्हणून चिलखत योजना जाहीर केली आहे. यामध्ये दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचणाऱ्या 1 हजार गोविंदांचा 100 कोटींचा मोफत विमा काढण्यात येणार आहे. दहीहंडी उत्सवाच्या दिवशी अनेक गोविंदा जखमी होतात. काही वेळा मृत्यूही होतो. अशा गोविंदांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी मनसेने ‘विमा सुरक्षा कवच’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या विम्याची मुदत 19 ऑगस्ट या दिवसभरासाठी असेल. ‘सुरक्षा कवच’ योजनेचा लाभ घेण्यासाठी गोविंदा पथकांनी मंडळाच्या लेटरहेडवर गोविंदांची वयासह नावे नोंदवून मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स येथे जमा करावीत, असं आवाहन मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलंय.
मनसेनच्या या चिलखत योजनेनुसार जर दहीहंडीवेळी गोविंदाचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि कायम स्वरुपी अंपगत्व आल्यास 10 लाख रुपये तसंच अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या गोविंदांना किंवा पथकांना कोणताही खर्च करावा लागणार नाही असंही मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
मनसेशिवाय भाजपकडूनही १० लाख रुपयांचे विमा सुरक्षा देण्यात येणार आहे. दहीहंडीच्या उत्सवात अनेक गोविंदांना दुखापत होते, त्यांचे अवयव गमावतात. त्यांची काळजी आपणच करायला हवी. देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून गोविंदांसाठी 10 लाखांचा विमा देण्याचं मुंबई भाजपनं जाहीर केलं असल्याचं भाजप आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.