Raghuveer Ghat : कोकणातील रघुवीर घाटात दरड कोसळली; २१ गावांचा संपर्क तुटला
Ratnagiri Khed Raghuveer Ghat cracks down: गेल्या २४ तासांपासून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यातच आता रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळल्याची माहिती मिळत आहे.
Ratnagiri Khed Raghuveer Ghat cracks down: कोकणात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विभागात सर्वात जास्त पाऊस हा रत्नागिरी जिल्ह्यात झाला असून अतिवृष्टीमुळं जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. परंतु आता रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या २४ तासांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळं ही दरड कोसळल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या ठिकाणी अशी दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात येताच प्रशासनानं गेल्या १२ तासांपासून रत्नागिरी-सातारा मार्ग बंद ठेवलेला होता. त्यामुळं दरड कोसळल्यानं कोणतही जिवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात येणाऱ्या रघुवीर घाटात गेल्या १५ दिवसांपासून दरड कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळं प्रशासनानं दरड हटवण्याचं काम हाती घेतलं असून दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या २४ तासांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळं रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी नदीला पूर आला असून राजापूर, लांजा आणि संगमेश्वरमध्येही मुसळधार पाऊस झाल्याची माहिती आहे. दरड कोसळल्याच्या या घटनेमुळं सातारा जिल्ह्यातील २१ गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटल्याचीही माहिती आहे.
साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील काही गावांना प्रशासकीय कामांसाठी महाबळेश्वरला जाणं परवडत नाही. त्यामुळं अनेक गावांचं दळणवळण व्यवस्था ही रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून चालत असते, आता रघुवीर घाटात दरड कोसळल्यानं सातारा जिल्ह्यातील २१ गावांची मोठी गैरसोय झाली आहे. प्रशासनानं मार्गालवरील दरड हटवण्याचं काम हाती घेतलं असून लवकरच मार्ग खुला करण्यात येणार असल्याही माहिती आहे.
संबंधित बातम्या
विभाग