Aaditya Thackeray Tweet on Mumbai Roads : मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. या पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांची वाताहत झाली आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर देखील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पेल्हार पोलिस अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी खड्डे बुजवतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून टीका केली आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची गरज असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (एनएचएआय) वाट पाहणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई अहमदाबाद मार्गावरर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये वाहने आदळून नादुरुस्त होत आहे. तर वाहतूक देखील संथ गतीने पुढे जात आहे. या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे आहे. मात्र, अद्याप त्यांनी दुरुस्ती सुरू न केल्यामुळे पोलिसांनींच हाती कुदळ आणि फावडे घेत या मार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरूवात केली आहे. येथील खड्ड्यांमुळे मुसळधार पावसात अपघात होण्याची शक्यता असल्याने वाट न पाहता खड्डे बुजवण्यास सुरूवाट केल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी पालघर आणि वज्रेश्वरीकडे जाणाऱ्या जंक्शनवरील खड्डे सिमेंटने भरतांना पोलिस दिसल्याने एहतून जाणाऱ्या वाहनचालकांना आश्चर्याचा धक्का बसला. 'हिंदुस्थान टाइम्स'ने २० जुलैच्या अंकात खड्डेमय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील प्रवाशांची व्यथा या बाबत वृत्त दिले होते. याची दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी येथील पाहणी केली. येथील खड्ड्यांमुळे वाहनचालक तासनतास वाहतुकीत अडकून पडत असल्याचे निदर्शनास आले.
वाहनचालक संतप्त होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही या पाहणीत आढळल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पेल्हार जंक्शनवरील खड्डे सिमेंटने भरण्याची जबाबदारी हातात घेतली, असे पोलिस निरीक्षक वनकोटी यांनी सांगितले.
वनकोटी म्हणाले, "आम्ही एनएचएआयच्या अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवण्याची वाट पाहू शकत नव्हतो. या मार्गावर अनेक अपघात होत असल्याने आम्ही येथील खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला आहे. वाडा आणि पालघरकडे जाणारा पेल्हार जंक्शन महत्त्वाचा मार्ग आहे. सध्याची परिस्थिती पाहता वाहनचालकांना जंक्शन ओलांडण्यासाठी किमान एक तास लागतो,' असे वनकोटी यांनी सांगितले.
या बाबत एनएचएआयचे प्रकल्प संचालक सुमीत कुमार म्हणाले की, एनएचएआयने नियुक्त केलेले कंत्राटदार दुरुस्तीची कामे करतात, परंतु आपत्कालीन परिस्थिती उद्भवली असावी म्हणून पोलिसांनी तातडीने खड्डे बुजवले असावे.
पोलिसांनी खड्डे बुजवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाजप आणि मिंधे सरकारच्या (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार) कंत्राटदार मित्रांऐवजी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांची मदत केली जात आहे. एखाद्या कंत्राटदाराला किंवा कंत्राटी कंपनीच्या मालकाला शासनाने असे खड्डे भरण्यास भाग पाडले आहे का? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) टॅग करत त्यांनी खड्ड्यांबाबत पोस्ट शेयर करून टीका केली आहे.
संबंधित बातम्या