राहुल गांधींच्या ‘ईडी’ चौकशी विरोधात काँग्रेसचा एल्गार, राजभवनावर धडक मोर्चा
राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला.
मुंबई -नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने काँग्रेस नेतेराहुल गांधी यांना समन्स जारी करून चौकशीसाठी बोलावल्यानंतर काँग्रेस नेते व कार्यकर्ते आक्रम झाले आहेत. ईडीने राहुल गांधी यांची सलग तीन दिवस चौकशी सुरू ठेवल्याने काँग्रेस संतप्त झाली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात सुरु असलेल्या ईडी चौकशीच्या निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र काँग्रेसच्यावतीने राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर,काँग्रेसच्या शिष्टमंडळाची आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट होऊ शकली नाही.
काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,नाना पटोले,एच के पाटील आदींच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळालाआज दुपारी साडे चार वाजताराजभवन येथे भेटीची वेळ दिली होती. परंतु आज बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयाकडून आलेल्या नव्या विनंतीनुसारच ही भेट रद्द करण्यात आली.राज्यपाल कोश्यारी राजभवन मुंबई येथे असून शिष्टमंडळाची भेट राजभवनाकडून रद्द केली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या संदर्भात काही नेत्यांनी राज्यपाल मुंबईत उपलब्ध नसल्याबाबत केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यानकेंद्रातील भाजप सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी हे देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही,केंद्र सरकारविरोधात आमचा संघर्ष सुरुच राहील,असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात,सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख,महिला व बालकल्यणा मंत्री यशोमती ठाकूर,शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.