महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी अनेक मतदारसंघात उमेदवारांची धावपळ पाहायला मिळाली. अनेक उमेदवार अखेरच्या क्षणी बदलून ऐन वेळी उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांची अर्ज भरताना चांगलीच दमछाक झाली. मात्र सर्वच ठिकाणी जोरदार शक्तीप्रदर्शन करत प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. काही ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या मित्रपक्षांनी एकमेकांविरोधातच एबी फॉर्म दिल्यामुळे वादचे प्रकारही घडले. नांदेड उत्तर व सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये तर शेवटच्या क्षणी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला.
नांदेड उत्तर मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आपआपले उमेदवार जाहीर केले होते. काँग्रेसकडून अब्दुल सत्तार तर शिवसेनेकडून संगीता पाटील डक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. या दोघांनाही त्यांच्या पक्षाने एबी फॉर्मही दिले होते. मात्र संगीता पाटील डक यांचा एबी फॉर्म ऐनवेळी रद्द करण्याची शिफारस शिवसेना ठाकरे पक्षाकडून करण्यात आली. शिवसेना ठाकरे पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी डक यांना दिलेला एबी फॉर्म रद्द करण्याचे पत्र निवडणूक विभागाला पाठवले आहे. दरम्यान सोलापूर दक्षिणमध्येही महाविकास आघाडीत अशाचप्रकारचा गोंधळ पाहायला मिळाला.
नांदेड उत्तरप्रमाणेच सोलापूर दक्षिणमध्ये काँग्रेसनेआधी जाहीर केलेल्या उमेदवाराला एबी फॉर्म नाकारला आहे. काँग्रेसने येथे दिलीप माने यांना तर शिवसेना ठाकरे गटाकडून अमर पाटील यांना तिकीट दिलं होतं, पण काँग्रेसने दिलीप माने यांना एबी फॉर्मच पाठवला नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर दिलीप माने यांनी काँग्रेसवर मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपकेला.
सोलापूर दक्षिणमधून काँग्रेसने माजी आमदार दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्रआज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने त्यांना एबी फॉर्म नाकारला. त्यामुळे दिलीप माने यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस मविआमध्ये राहून स्वत:च्याच जागा घालवत असल्याचं माने यांनी म्हटलं. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नमती बाजू घेत असल्याचा आरोपही माने यांनी लावला आहे.
संबंधित बातम्या