Bharat Jodo Yatra In Maharashtra : भाजपच्या धार्मिक विद्वेषाच्या राजकारणाविरोधात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर अशी ३५०० किलोमीटरची भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणानंतर आता येत्या सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. त्यामुळं आता राहुल गांधींचं महाराष्ट्रात स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता या यात्रेला शिवसेना आणि राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसकडून यात्रेचं संपूर्ण नियोजन...
महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेच्या प्रचाराची आणि नियोजनाची जबाबदारी माजी मंत्री सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे. सतेज पाटलांनी भारत जोडो यात्रेसाठी कार्यकर्त्यांची फौज उभी केली असून ते लवकरच देगलूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर आणि विजय वडेट्टीवार हे कॉंग्रेसचे नेतेही यात्रेत सहभागी होणार आहेत.
शरद पवारही यात्रेत होणार सहभागी?
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सामील होणार असल्याचं बोललं जात होतं. परंतु त्यांची प्रकृती चांगली नसल्यानं ते मुंबईतील रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यामुळं आता ते भारत जोडो यात्रेत दाखल होणार की नाही, याबाबतचा संभ्रम वाढला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे देखील आपल्या सहकाऱ्यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शिवसैनिकांच्या बैठका घेत असल्यामुळं ते यात्रेत सहभागी होणार नसल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या