
अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला राज्यातला शेतकरी सत्ताधारी भाजपा सरकारकडे मदतीसाठी याचना करत आहे. परंतु सरकारला शेतकऱ्यांचे दुःख दिसत नसल्याने त्याच्यावर स्वतःचे अवयव विकण्याची वेळ आली असल्याचं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. सरकारकडे जाहीरबाजी व इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत परंतु शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का, असा सवाल कॉंग्रेसने विचारला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या लीडरशीप डेव्हलपमेंट मिशन अभियानाची बैठक आज पार पडली. या कार्यक्रमानंतर पटोले मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘मुंबईत सरकार दरबारात शेतकरी मदतीची वाट पहात आहेत. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडे २५०० कोटी रुपयाची मागणी केली असल्याचं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. परंतु सरकारकडे उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत, शेतकऱ्यांना द्यायला नाही, असा आरोप पटोले यांनी केला. दुष्काळामुळे महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना गेले दोन दिवस राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. यावर्षीचे दोन्ही हंगाम वाया गेल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुष्काळ जाहीर करण्यातही भाजपा सरकार राजकारण करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला.
संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला भरीव मदत देऊन सरकारने त्यांना संकटातून बाहेर काढले पाहिजे. परंतु शेतकऱ्याला मदत करतानाच सरकार हात आखडता घेत असल्याचं पटोले म्हणाले.
सत्ताधारी भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी सरकार असून या सरकारला नागपूर हिवाळी अधिवेशनात जाब विचारून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे पाठपुरावा केला जाईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन पटोले यांनी केले आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला सोपा वाटतो काय, असा प्रश्न उपस्थित करत मराठा-ओबीसी वादाला सरकार जाणीवपूर्वक खतपाणी घालत असल्याता आरोप पटोले यांनी केला. मराठा-ओबीसी वाद पुढच्या पिढ्यांसाठीही घातक ठरणारा असून भाजपा सरकारने आरक्षणप्रश्नी स्पष्ट व ठोस भूमिका घ्यावी तसेच जातनिहाय जनगणना करावी, असं पटोले म्हणाले.
संबंधित बातम्या
