वाढत चाललेली महागाई, बेरोजगारीची समस्या, नीट पेपरफुटीचे प्रकरण, महिलांची सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक याविरोधात राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी कॉंग्रेस पक्षातर्फे शुक्रवारी, २१ जून रोजी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांवर सकाळी ११ वाजता सरकारच्या प्रतिमेस चिखल लावून ‘चिखल फेको’ आंदोलन करून भाजपाप्रणित सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.
राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना राज्यातील सत्ताधारी महायुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असून महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार २१ जून रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात सरकारी रिक्त पदे भरण्याबाबत चालढकल केली जात असून अनेक ठिकाणी चिखलामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाने केला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. श्रीमंतांची मुले गोरगरिबांना गाड्याखाली चिरडून मारत आहेत. मुलींचे दिवसाढवळ्या रस्त्यावर खून पाडले जात आहेत. सत्ताधारी पक्षाकडून जाती-धर्माच्या नावाखाली सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
हे वाचाः Fact check: लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये ११० मुस्लिम खासदार निवडून आले?
राज्य व केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कष्टकरी, दलित, अल्पसंख्याक, महिला, तरूण, गरीब व सामान्य जनतेच्या विरोधातील आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चालणाऱ्या महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासण्याचे काम या सरकारने केले आहे. मागील १० वर्षापासून भाजपा सरकारने राज्यातील औद्योगिक विकासाला खिळ घातली आहे. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेतल्या जात नाहीत, ह्या परीक्षा घेतल्या तर पेपरफुटीचे ग्रहण लागते, शेतकरी संकटात आहे पण त्यांना मदत दिली जात नाही. कांदा, कापूस, सोयाबीन यासह कोणत्याही शेतमालाला भाव नाही, सरकार किमान भाव देत नाही. कठिण काळात जनतेला मदत करण्याऐवजी सरकार जनतेचे शोषण आणि आर्थिक पिळवणूक करत आहे. NEET परिक्षेच्या पेपरफुटी व निकालातील गैरव्यवहारामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकारने धोक्यात आणले आहे असा आरोप कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आला आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख कॉंग्रेस नेते, माजी मंत्री, खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, सेवादल, इंटक, सेल व विभाग यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारचा निषेध करणार आहे.
संबंधित बातम्या