- जालन्यातल्या चांदई एक्को गावातील परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचं पोलीस म्हणतायत. मात्र जमावाच्या दगडफेकीत काही पोलीस जखमीही झाल्याचं समजतय.
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे गावच्या प्रवेशद्वाराला नाव देण्यावरून दोन गटात राडा झाला होता.यावेळी गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केली होती.या दगडफेकीत बंदोबस्तावरील अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस व्हॅनच्या, अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत.त्यामुळे पोलीस व्हॅनसह शासकीय गाड्यांचं नुकसान झालंय.गावात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला.या गोळीबारात पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान सध्या गावात शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे.पोलीस प्रशासन योग्य कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी दिलीय.
ट्रेंडिंग न्यूज
या घटनेतील काही व्हिडिओ व्हायरल झाले असून त्यात पोलिसांच्या व्हॅन वर दगडफेक करण्यात येत असल्याचे दिसून आल्याने आज पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं असून समाज कंटकांचे अटक सत्र सुरू झाले आहे.गावात खबरदारीचा उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जवळपास २५० लोकांवर वेगवेगळ्या ३ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
काय आहे वादाची पार्श्वभूमी
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को गावात एक पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झाला होता. गावच्या प्रवेशद्वाराला वेगळं नाव देण्याची मागणी गावातल्या काही घटकांनी केली होती. तेव्हा या दोन गटांमध्ये वाद उफाळून आला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला खरा मात्र पोलिसांनी दरडावण्याचा प्रयत्न करताच जमाव संतप्त झाला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली.जमाव पांगत नसल्याने जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या गोळीबारात काही जणं जखमी झाले होते त्यांना उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलिसांनी हवेत गोळीबार केल्यानं जखमी झालेल्या त्या पाच जणांची स्थिती चांगली आहे. मात्र गावात कोणताही अनुचित प्रकार घडू देऊ नका असं पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी अधिकाऱ्यांना बजावलं आहे. सध्या गावात मात्र तणावपूर्ण शांतता आहे.