मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजेश टोपेंनी आगामी तीन दिवसात कामं पूर्ण करावी, रावसाहेब दानवेंचं सूचक वक्तव्य

राजेश टोपेंनी आगामी तीन दिवसात कामं पूर्ण करावी, रावसाहेब दानवेंचं सूचक वक्तव्य

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jun 26, 2022 03:11 PM IST

जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मी फक्त २ ते ३ दिवस विरोधी पक्षात आहे असं रावसाहेब दानवे म्हणालेत.

रावसाहेब दानवे
रावसाहेब दानवे (हिंदुस्तान टाइम्स)

Maharashtra Political Crisis : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत दिले आहेत.आज रावसाहेब दानवे आणि राजेश टोपे (Raosaheb Danve And Rajesh Tope) यांच्या उपस्थितीत जालना (Jalna) शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं.यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी टोपे यांना उद्देशून एक लक्षवेधी भाष्य केलं आहे. या वक्तव्यानं रावसाहेब दानवेंच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारला हा इशारा तर देण्यात आला नाही ना असा प्रश्न आता विचारला जात आहे. 

काय म्हणालेत रावसाहेब दानवे?

जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून मी फक्त २ ते ३ दिवस विरोधी पक्षात आहे.अजून संधी हवी असेल तर विचार करता येईल असं म्हणत दानवे यांनी २ ते ३ दिवसांतच राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता देखील दानवे यांनी फेटाळून लावली.तसंच एकनाथ शिंदे यांच्या गटाशी युती करायची की नाही याबाबत भाजपचे राज्यातील नेते निर्णय घेतील असंही दानवे यांनी म्हटलं आहे.देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची गुजरातमध्ये कोणतीही भेट झाली नाही असंही दानवे म्हणाले. मात्र आमच्या पक्षाच्या बैठका जरी सुरू असल्या तरी राज्यातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत असंही दानवे यांनी नमूद केलं.राष्ट्रवादी कायदेशीर लढाई त्यांच्या पद्धतीने लढणार असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे असंही दानवे म्हणाले.

रावसाहेब दानवे यांच्या या भाष्यामुळे राज्यातल्या घडामोडी आगामी दोन ते तीन दिवसात वेगाने बदलू शकतात असे संकेत मिळाले आहेत. रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रपती राजवटीची फेटाून लावलेली शक्यता भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात सारं काही ठरलं असल्याच्या शक्यतेला बळ देत आहे. आगामी दोन ते तीन दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या तर आश्चर्य वाटायला नको.

IPL_Entry_Point