मुंबई पलीकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहीतच नाही, फडणवीसांची टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोरोना काळात घरातून बाहेर पडलेच नाहीत यावरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी टीका केली.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज लातूरमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण केले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये औसा इथं बोलताना फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली. मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडत नाहीत. मुंबई पलीकडचा महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना माहिती नाही असं फडणवीस म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मुंबई म्हणजे महाराष्ट्र असं वाटतं. मुंबई पलिकडचा महाराष्ट्र त्यांना माहितीच नाही. अडीच वर्षाच्या काळात ते केवळ एकदाच पाहणी दौऱ्यावर सोलापूरला गेले होते. तेव्हा त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं होतं. त्यापलिकडे ते गेले नाहीत. कुण्याच्याही बांधावर जायचं कष्ट त्यांनी घेतलं नाही असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औसा तालुक्यात रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं. आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतरस्त्याचा प्रश्न मांडला होता. त्या चळवळीला यश मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पण केलेल्या रस्त्याची लांबी १ हजार ३०० किमी इतकी आहे. याशिवाय फडणवीस यांनी २ हजार ५०० एकर फळबाग आणि १ हजार पशु गोठ्यांचे लोकार्पण केले. शेत रस्त्यांमळे ग्रामिण भागातले रस्ते अधिक चांगले होणार आहेत. तसंच शेतीची कामे वेगाने होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द केला आहे. ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले असल्याचे समजते. देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा नियोजित होता, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी दौरा अर्धवट सोडून मुंबईला परतावं लागलं आहे. त्यांना ताप आल्याचं सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या