मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेगटात नाराजी; केंद्राकडं करणार तक्रार?

कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिंदेगटात नाराजी; केंद्राकडं करणार तक्रार?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 30, 2022 10:55 AM IST

Bhagat Singh Koshyari Controversial Statement : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपालांविरोधात आता विरोधकांसह शिंदेगटही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Chief minister Eknath Shinde addresses
Chief minister Eknath Shinde addresses (HT_PRINT)

Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं विरोधकांनी शिंदे सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं असून राज्यपालांना नारळ देण्याची मागणी कॉंग्रेसनं केली आहे. याशिवाय शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तब्बल चार ट्विट्स करत मुख्यमंत्री शिंदे, राज्यपाल कोश्यारी आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.

शिंदेगटात नाराजी?

राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिंदेगटात नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. कारण शिंदेगटाचे आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी केलेलं वक्तव्य हे महाराष्ट्राचं अपमान करणारं असल्याचं म्हटलं आहे. कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदेगटाचे प्रवक्ते केसरकर म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद असून कोश्यारींनी यापुढं अशी विधानं करू नये, अशी ताकीद त्यांना केद्रानं द्यायला हवी, मुंबईच्या उभारणीत सर्वांचा वाटा आहे, परंतु त्यात मोठा वाटा हा मराठी माणसांचा असल्याचं केसरकर म्हणाले.

केंद्राकडं करणार तक्रार?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी असल्याचं सिद्ध होतं, त्यांनी राज्यातील लोकांच्या भावना जपायला हव्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत, ते मुंबईत आल्यानंतर मराठी माणसांची भावना केंद्राला कळवण्याचा आग्रह आम्ही करणार असल्याचंही केसरकर म्हणाले.

नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी?

मुंबईतील अधेरीतल्या एका कार्यक्रमात बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 'गुजराती आणि राजस्थानी लोकांनी मुंबई सोडली तर मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी राहणार नाही', असं राज्यपाल म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यातील अनेक नेत्यांनी निषेध केला आहे.

५० खोकेवाले कुठं लपलेत-संजय राऊत

राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतांनी जोरादार टिकास्त्र सोडलं आहे. '१०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता, मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय ना, की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे, स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागण्याची मागणी' राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंकडं केली आहे. याशिवाय त्यांनी राज्यपालांसहित बंडखोर आमदारांवरही या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

राज्याच्या राज्यपालच राज्याच्या जनतेची बदनामी करतो, हे भयंकर असून अशा राज्यपालांना तात्काळ नारळ द्यायला हवा, अशी टीका कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केली होती. मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे, मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय, त्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या