बंडावेळी शहीद होण्याचा धोका होता; गाववाल्यांसमोर मुख्यमंत्री शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट
CM Eknath Shinde: राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच त्यांच्या मूळ गावी दरे इथं आले आहेत. यावेळी त्यांनी गावातील पद्मावती देवीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी गेले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावकऱ्यांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आधी गुजरातमधील सुरत गाठली होती, त्यानंतर ते गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, या बंडावेळी थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता, पण लोकांच्या आणि देवीच्या आशीर्वादाने सगळं सुरळीत झालं असं मुख्यमंत्री म्हणाले.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच त्यांच्या मूळ गावी दरे इथं आले आहेत. यावेळी त्यांनी गावातील पद्मावती देवीचं मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, बंड करताना थोडा जरी दगाफटका झाला असता तरी शहीद होण्याचा धोका होता. पण लोकांचे आणि देवीचे आशीर्वाद असल्यानं सगळं सुरळीत झालं."
राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार एक महिन्यानंतर झाला, आता खातेवाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलं आहे. खातेवाटपाबद्दलही एकनाथ शिंदे यावेळी बोलले. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल विचारलं जात होतं, तो झाला. आता त्याप्रमाणेच खातेवाटपही होईल. लवकरच सगळ्या गोष्टी वेळेवरच होतील. आम्ही विकासकामे थांबू दिली नाहीयेत. अतिवृष्टीमुळे नुकासन झालेल्या शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत दिलीय. एनडीआरएफच्या नियमाच्या दुप्पट नुकसनाभरपाई द्यायचा निर्णय घेतला आहे. २ हेक्टरची मर्यादा ३ हेक्टर केली आहे. असे अनेक निर्णय आम्ही महिन्याभरात घेतले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.