मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Unseasonal rain : अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकरी संकटात; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Unseasonal rain : अतिवृष्टीमुळं राज्यातील शेतकरी संकटात; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 07, 2023 02:12 PM IST

Heavy Rains In Maharashtra : गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis (HT_PRINT)

Maharashtra Chief Minister Eknath Shinde : हवामानात झालेल्या बदलांमुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वीजेच्या कडकडाटांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं गहू, मका, कांदा, फळबागांसह भाजीपाल्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्यामुळं शेतकरी संकटात सापडलेला असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागांचे पंचानामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीनं नुकसानभरपाई दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव आणि जिल्हाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक बोलावून राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थिचा आढावा घेतला आहे. त्यानंतर महसूल विभागानं नुकसानग्रस्त भागांत पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. याशिवाय राज्यातील सरकार संकटकाळात शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचं वक्तव्यही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केलं आहे. त्यामुळं आता अतिवृष्टीग्रस्त भागांचे महसूल विभागाकडून तातडीनं पंचनामे करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

रविवारपासून राज्यातील अनेक भागांमध्ये सोसाट्यांच्या वारा आणि वीजेच्या कडकडांसह झालेल्या अवकाळी पावसामुळं फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नाशिक, नंदूरबार आणि अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये द्राक्ष आणि कांदा या पिक जमीनदोस्त झाली आहेत. तर मराठवाडा आणि विदर्भात गव्हाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. पालघरसह कोकणात गारपीट झाल्यामुळं रब्बी पिकांचं मोठं नुकसान झाल्यामुळं शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारनं नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp channel