मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राज्यपालांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्यपालांच्या विधानावर मुख्यमंत्री शिंदे यांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले…

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jul 30, 2022 03:57 PM IST

CM Eknath Shinde On BS Koshyari: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळं राज्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

CM Eknath Shinde On BS Koshyari
CM Eknath Shinde On BS Koshyari (PTI)

Bhagat Singh Koshyari Controversial Statement On Mumbai: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेलं विधान हे त्यांचं वैयक्तिक मत असून आम्ही त्याच्याशी सहमत नाही, मराठी माणसामुळंच मुंबई आणि महाराष्ट्राला वैभव प्राप्त झालेलं आहे, संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीनं काळजीपूर्वक विधानं करायला हवीत', अशी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना टोला हाणला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या इतर राज्यातील लोकांना मुंबईला असलेल्या महत्त्वामुळं रोजगार मिळतो, त्यामुळं मुंबईचा कुणालाही अपमान करता येणार नाही, मुंबईनं अनेक संकटं पाहिलेली आहे, अनेक प्रसंग आले पण त्यात कधीही मुंबई थांबलेली नाही, देशातील कोट्यवधी लोकांना मुंबई रोजगार देतेय, त्यामुळं मुंबईचा अपमान कुणीही करू नये, राज्यपालांनी बोलताना काळजी घेण्याचा सल्लाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना दिला आहे. मुंबईला आर्थिक राजधानी बनताना त्यात मराठी माणसांनी दिलेलं योगदान विसरता येणार नाही, १०६ हुतात्म्यांनी मुंबईसाठी बलिदान दिलेलं असून त्यामुळं राज्यपालांनी बोलताना कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिला आहे.

विरोधक आक्रमक...

राज्यपालांनी मुंबईबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. याशिवाय शिवसेना नेते संजय राऊतांनी राज्यपालांच्या या वक्तव्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर निशाणा साधला होता. दरम्यान आता पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

गुजराती आणि राजस्थानी लोकांनी मुंबई सोडली तर मुंबई देशाची राजधानी राहणार नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य काल अंधेरीतील एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलं होतं. त्यानंतर राज्यात राजकीय वादंग पेटलं होतं.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या