रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी मोठी घोषणा करत त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ, वैद्यकीय सुविधा आदींची घोषणाही करण्यात आली आहे.
आज (मंगळवार) शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांच्या पुढाकाराने रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळने मुख्यमंत्र्यांची भेट घेचली. या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी या महामंडळाच्या अंतर्गत मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, रिक्षा टॅक्सी चालकांसाठी' महाराष्ट्र टॅक्सी ऑटोरिक्षा चालक मालक कल्याणकारी महामंडळ'सुरू करण्यात येणार आहे.मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना परिवहन विभागाकडून (Transort Department) जो अतिरिक्त दंड आकारला जातो, तो यापूढे आकारला जणार नसल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. तशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी परिवहन विभागाच्या आयुक्त आणि पोलीस उपयुक्तांना दिले आहे. मात्र जर एखाद्या रिक्षा व टॅक्सी चालकाने त्यासोबतच नियम मोडला असेल तर मात्र हा दंड आकारला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री म्हणाले की, लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल. त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षण दिले जाईल. ज्यांची मुले आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनी सोबत एक करार केला आहे. दुखापत झाल्यास चालकाला ५० हजार रुपये देण्याची तरतूद महामंडळामध्ये केली आहे. त्यांना ग्रॅच्युईटी दिली जाईल, यासाठी वर्षाला ३०० रुपये भरावे लागतील, असे शिंदे म्हणाले. प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाला जीवन विमा कवच देण्यात येईल, रिक्षा-टॅक्सी चालकांसह त्यांच्या कुटूंबियांना मोफत वैद्यकीय उपचार मिळावे, यासाठी तरतूद करण्यात येणार आहे.
रिक्षा किंवा टॅक्सी चालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती तसंच उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यात येईल, त्यांच्या मुलांना कौशल्यविकास विभागाच्या माध्यमातून तंत्रकुशल केले जाईल तसेच मुख्यमंत्री रोजगार योजनेच्या माध्यमातून त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळेल.
यासाठी प्रत्येक चालकाला वर्षाला ३०० रुपये म्हणजे प्रतिमहिना २५ रुपये जमा करावे लागतील तर त्यात उर्वरित भार शासनाकडून टाकण्यात येईल. त्यासाठी उद्योग,खनिकर्म आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून निधीची तरतूद करण्यात येईल असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
येत्या काही दिवसात या महामंडळाची रुपरेषा अंतिम करून परिवहन विभागाच्या कार्यालयामार्फत याचे लाभ रिक्षा टॅक्सी चालकांपर्यंत पोहचवण्यात येतील. परिवहन विभागातून याचे कार्ड काढावे लागणार आहे.
संबंधित बातम्या