
Buldana Bus Fire: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ बसला आग लागल्याने मोठी जीवितहानी झाली. टायर फुटल्याने बस दुभाजकाला धडकली, त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. या आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहे. जखमींवर बुलढाण्याच्या सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारणात ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. एमआयएमचे खासदार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या अपघाताला जबाबदार धरले आहे. राजकीय श्रेय घेण्यासाठी कोणतीही रोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन करण्यात आले, असा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, "मी याला अपघात म्हणणार नाही, हा घात आहे आणि हा घात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यांनी राजकीय स्वार्थासाठी कोणतीही सोड सेफ्टी न पाहता हे उद्घाटन केले. रोड सेफ्टीचे नियम असतात. त्याचं क्लिअरन्स मिळालं आहे का तुम्हाला? काय दोष आहेत? इथे का अपघात होत आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता गेल्यानंतर कोणतरी दुसरे येऊन उद्घाटन करेल, अशी भिती वाटत होती. म्हणून त्यांनी घाई गडबडीत रस्त्याचे उद्घाटन केले. हा अपघात नसून हत्या आहे. याला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, जे आता पाच लाखांची घोषणा करण्यासाठी आले आहेत.
या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.
संबंधित बातम्या
