Kanadgaon Gram Sabha : पाणी प्रश्नावरून ग्रामसभेत तुफान राडा; गावकऱ्यांनी ग्रामसेवकांना धरलं धारेवर, पाहा VIDEO
Kanadgaon Gram Sabha : गावातील विविध समस्यांवर ग्रामस्थांनी सरपंचांसह ग्रामसेवकांना खडेबोल सुनावत धारेवर धरलं. वादावादीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Kanadgaon Gram Sabha Viral Video : राज्यातील ग्रामीण भागांमध्ये पायाभूत सुविधांची नेहमी वाणवा असते. त्यामुळं अनेकदा ग्रामसभेत नागरिक पाणी, वीज आणि रस्त्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक होत असतात. त्यातच आता अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातून समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील अगर कानडगाव या गावात ग्रामसभेत मोठा राडा झाला आहे. पाणी प्रश्नावरून गावकऱ्यांनी सरपंच तसेच ग्रामसेवकांना धारेवर धरत जोरदार प्रश्नांची सरबत्ती केली. परिणामी ग्रामसभा सुरू असताना ग्रामपंचायत परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परंतु गावातील जेष्ठ नागरिकांनी समंजस भूमिका घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील कानडगावात मंगळवारी म्हणजेच आज सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभा सुरू होताच गावातील जेष्ठ नागरिक गणी सय्यद यांनी पाणीप्रश्नावरून ग्रामसेवक विजय रावते आणि सरपंच दिनकर दंडे यांना धारेवर धरलं. त्यानंतर नाले, ड्रेनेज, सांडपाणी तसेच अन्य विविध मुद्द्यांवरून मनोज पाठे यांनी आक्रमक भूमिका घेत तातडीनं विकासकामं मार्गी लावण्याची मागणी केली. परंतु यावेळी ग्रामसेवक विजय रावतेंनी त्यांच्या म्हणण्याकडे लक्ष न दिल्याने मनोज पाठे आणि सतिश दंडे हे चांगलेच संतापले. त्यानंतर ग्रामसभेत जोरदार वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कानडगाव हे गोदावरी खोऱ्यातील पुनर्वसित गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावात अद्यापही एसटी बस येत नसल्याने ग्रामसभेत नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. याशिवाय गावातील ड्रेनेज, अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, शेतरस्ते आणि वीजेच्या प्रश्नावरूनही ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंचांना खडेबोल सुनावले. पुनर्वसित गाव असल्याने विविध विकासकामं होण्यास वेळ लागतो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ग्रामसेवक विजय रावते यांनी म्हटलं आहे.
विभाग