Protest near Matoshree for Maratha Reservation : राज्यात मराठा अरक्षणावरून रान पेटले आहे. मनोज जरांगे यांनी राज्यभरात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा दौरा सुरू केला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन सुरू असतांना मराठा आंदोलकांच्या एका गटाने महाविकास आघाडीतील पक्षांनी अरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज याच गटाने रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री बाहेर ठिय्या आंदोलन करत उद्धव ठाकरे यांनी अरक्षणाबद्दल भूमिका घ्यावी अशी मागणी केली. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आंदोलकांची भेट घेतली.
राज्यात मराठा आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांच्या एका गटाने थेट मातोश्रीवर मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांनी उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतला. यावेळी मातोश्री समोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी आग्रही होते. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत ठाकरे यांनी आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. शेकडो पोलिसांनी त्यांना कला नगरमध्ये येण्यापासून रोखले.
"सर्वपक्षीय नेते आमच्याकडे मतांसाठी आले होते. पण आज मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचल्यावर ठाकरे आम्हाला भेटायला तयार नाहीत. आम्ही शरद पवार, नाना पटोले, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेरही आंदोलन करू, असे मोर्चाचे नेतृत्व करणारे रमेश केरे-पाटील म्हणाले. या आंदोलनाची माहिती मिळाल्यावर विधान परिषदेचे नेते अंबादास दानवे हे आंदोलनस्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा देखील केली. यावेळी दाणवे म्हणाले, "आमच्या पक्षाने मराठा आरक्षणाला आधीच पाठिंबा दिला आहे, आता हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे."
'मातोश्री बंगल्यावर गेलेली माणसं ही मराठा आंदोलनाशी संबंधित माणसं नाहीत. ते प्रवीण दरेकर यांनी पाठवलेली माणसं आहेत. दरेकर यांनी फडणवीस यांच्याकडून सुपारी घेतली आहे. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय करिअर संपवल्याशिवाय राहणार नाही. याचे परिणाम सरकारला भोगावं लागणार आहे', अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
अंबादास दानवे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यांनी मातोश्रीवर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यानंतर मातोश्रीबाहेर असणाऱ्या मराठा आंदोलकांची भेट घ्यायला तयार झाले आहेत. आता रमेश केरे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली चार जणांचे शिष्टमंडळ उद्धव ठाकरे यांना भेटेल. यावेळी नेमकी काय चर्चा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या