Shivsena Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळावा घेण्यावर ठाम, मात्र कधी व कुठे?
शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी पुढे सरसावला असला तरी ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. दसरा मेळावा आयोजनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या गटातील सर्व आमदार,खासदार,नगरसेवक आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली.
मुंबई – शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कुणाची यावरून राज्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आता शिवसेनेचा पंरपरागत दसरा (Shivsena Dasara Melava) मेळावा कोण घेणार? यावरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेणाण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (Cm Eknath shinde) दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. दसरा मेळावा भव्य व विक्रमी शिवसैनिकांच्या उपस्थित करण्याचा निर्धार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार-खासदारांनी केला आहे.
शिंदे गट दसरा मेळाव्यासाठी पुढे सरसावला असला तरी ठिकाण अजून निश्चित झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या गटातील सर्व आमदार,खासदार,नगरसेवक आणि पदाधिकारी यांची महत्वाची बैठक पार पडली.या बैठकीनंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्याबाबत माहिती दिली.
गुलाबराव पाटील म्हणाले की, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळीदसरा मेळावा होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली आहे. कुठे परवानगी मिळेल,त्याठिकाणी मेळावा घेतला जाईल. यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतील,असेही त्यांनी म्हटले. २० ते ३० सप्टेंबर दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांची शिव संवाद यात्रा सुरू होणार असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होतो,पण यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. शिवसेना नेमकी एकनाथ शिंदेंची का उद्धव ठाकरेंची,हा वाद सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे असल्यामुळे मुंबई पालिका आयुक्तांनाही याबाबत निर्णय घेताना अडचण येणार आहे.
सध्या राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात दसऱ्याला शिवाजी पार्कवर मेळावा कोण घेणार यावरून वाद होताना दिसत आहे. यासाठी परवानगी कुणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली असताना अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील नागरिकांना मात्र आगळं वेगळं आवाहन केलं आहे. सद्विवेक बुद्धी असलेल्या कोणत्याही माणसाने कोणत्याही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी दसऱ्याला बाहेर पडू नये असं त्यांनी म्हटलंय. दसऱ्याला इतर नेत्यांची भाषणे ऐकायला बाहेर पडू नये, मी माझा मेळावा घेईन. तोही दसरा, दिवाळी, गुढीपाडवा हे सण सोडून. आता माझी वेळ आली आहे. महाराष्ट्रासाठी,प्रत्येकाचा एक काळ असतो.त्यांचा काळ गेलाय. आता अभिजीत बिचुकले येईल. एका जाती-धर्माच्या किंवा प्रांताच्या नाही तर सर्व समाजासाठी,महाराष्ट्रासाठी असंही अभिजीत बिचुकले यांनी म्हटलंय.
संबंधित बातम्या