Chhatrapati Sambhaji Nagar Fire: छत्रपती संभाजीनगरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. ही घटना सिल्लोड तालुक्यातील आमठाणा गावाजवळ आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बसचालक आणि दोन शिक्षकांच्या प्रसंगावधानामुळे ३५ विद्यार्थ्यांचा जीव वाचला. मात्र, या घटनेमुळे आपल्या मुलांना बसने शाळेत पाठवणाऱ्या पालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील शाळेत परिसरातील छोट्या- मोठ्या खेडेगावातील मुले शिक्षण घेतात. या शाळेत शिक्षण घेणारे काही मुले खाजगी वाहने ये-जा करतात. तर, काही मुलांच्या पालकांनी त्यांना स्कूल बस लावली आहे. दरम्यान, आज सकाळी इयत्ता चौथी ते सातवी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बसने अचानक पेट घेतला. मात्र, त्यावेळी बसमध्ये असलेले दोन शिक्षक आणि चालकामुळे विद्यार्थ्यांचा जीव वाचला. या बसमध्ये एकूण ३५ विद्यार्थी होते.
अपघातग्रस्त बस आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास घाटनांद्रा येथून शाळेच्या दिशेने जात होती. त्यावेळी बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने लगेच बस थांबवली आणि दोन शिक्षकांच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढले. यानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला. बस चालक आणि बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.
शालेय बसला आग लागल्याची माहिती समजताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत संपूर्ण जळून खाक झाली. मात्र, ही आग कशामुळे लागली, हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, या घटनेने पालकांमध्ये भिती पसरली आहे.
संबंधित बातम्या