Central Railway News: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. मध्य रेल्वेने रविवारी मध्यरात्रीपासून २२ तासांच्या ब्लॉकसह एकूण चार ब्लॉक घोषित केले आहेत. कसारा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकचे विस्तारीकरण-रुंदीकरण करणे, यार्डातील रेल्वे मार्गिकांचा विस्तार करणे, नॉन इंटरलॉकिंगसह अन्य यांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे लोकलच्या २२ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, एकूण ४९ एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वेचा हा मेगाब्लॉक रविवारी (२० ऑक्टोबर २०२४) मध्यरात्री ३.२० ते सोमवारी (२१ ऑक्टोबर २०२४) मध्यरात्री १.२० मिनिटापर्यंत असेल. रविवारी सकाळी १०.४० ते दुपारी १.४० पर्यंत डाऊन मार्गावर ३ तासांचा मेगा ब्लॉक असेल. तर, रविवारी दुपारी १२.४० ते १.४० पर्यंत अप मार्गावर एक तासाचा आणि रविवारी सायंकाळी ७.२० ते रविवारी मध्यरात्रीनंतर १.२० पर्यंत अप-डाऊन मार्गावर सहा तासांचा ब्लॉक असेल. यामुळे २२ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, अनेक एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. ब्लॉकमुळे परिणाम झालेल्या रेल्वेगाड्यांच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळाशी संपर्क साधावा.
रेल्वे बोर्डाने बुधवारी आरक्षणाचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर करण्याची घोषणा केली. १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीअंतर्गत ३१ ऑक्टोबरपर्यंत केलेले बुकिंग अबाधित राहील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. मात्र, ६० दिवसांच्या आगाऊ आरक्षण कालावधीनंतर केलेले बुकिंग रद्द करण्याची मुभा देण्यात आली.
फिरोजपूरचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक परमदीप सिंह सैनी यांनी सांगितले की, जे काही महिने आधीच सहलीचे नियोजन करतात, त्यांना कन्फर्म तिकीट मिळण्याची योग्य संधी मिळेल. हा नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. ताज एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस यांसारख्या काही डे-टाइम एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत कोणताही बदल केला जाणार नाही, जेथे आगाऊ आरक्षणासाठी कमी वेळेची मर्यादा लागू आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे. परदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेच्या बाबतीतही कोणताही बदल केला जाणार नाही. २५ मार्च २०१५ रोजी रेल्वे मंत्रालयाने आगाऊ आरक्षणाचा कालावधी ६० दिवसांवरून १२० दिवसांपर्यंत वाढवला होता.
रेल्वेच्या आगाऊ आरक्षणाच्या कालावधीत वेळोवेळी बदल करण्यात आले आहेत. आगाऊ आरक्षणाचा कालावधी ३० दिवसांपासून १२० दिवसांपर्यंत बदलला आहे. विविध कालावधीतील अनुभवाच्या आधारे प्रवाशांच्या दृष्टिकोनातून ६० दिवसांचा आगाऊ आरक्षण कालावधी हा इष्टतम कालावधी म्हणून पाळण्यात आला आहे. एप्रिल १९८१ पासून १ एप्रिल २०१५ पर्यंत १२ वेळा १२० दिवस ते ३० दिवसांच्या दरम्यान एआरपी वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय अनेकवेळा कसा बदलण्यात आला, हे दर्शविणारा तक्ताही सादर करण्यात आला.
संबंधित बातम्या