Yavatmal Car Fire News: यवतमाळच्या कळंब येथे मोठी दुर्घटना टळली. यवतमाळ वरून नागपूरच्या दिशने जाणाऱ्या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने, या कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचा जीव वाचला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेत कार जळून खाक झाली. कशामुळे कारने पेट घेतला, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास यवतमाळवरून नागपूरकडे जाणाऱ्या महिंद्रा क्वांटो कारने कळंबपासून दोन किलोमीटर अंतरावर असताना अचानक पेट घेतला. ही कार अमोल बळीराम राठोड यांच्या मालकीची आहे. अमोल हे आपल्या कुटुंबासह नागपूरला जात होते. परंतु, रस्त्यातच कारच्या बोनेमधून अचानक धूर निघायला सुरुवात झाली. चालकाने प्रसंगावधान दाखवत कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर काही क्षणातच कार जळून खाक झाली.
मालाड येथे सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडल्याने तिघांचा मृ्त्यू झाला आहे. अंबुजावडी येथील अब्दुल हमीद रोडवरील मालवणी गेट क्रमांक ८ येथे गुरुवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, या तिन्ही मजुरांना नाला साफ करण्याचे कंत्राट देण्यात आले होते, त्यावेळी ते सार्वजनिक शौचालयाखालील नाल्याच्या चेंबरमध्ये पडले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक माहितीच्या आधारे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती मालवणी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही आणि गैरप्रकार आढळल्यास आम्ही स्वत: गुन्हा दाखल करू. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
संबंधित बातम्या