‘जन संपर्क और हिंदी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ‘जन संपर्क और हिंदी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

‘जन संपर्क और हिंदी’ या पुस्तकाचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते प्रकाशन

HT Marathi Desk HT Marathi
Jun 12, 2024 07:15 PM IST

मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कुमार सिंह यांनी लिहिलेल्या ‘जन संपर्क और हिंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले.

‘जन संपर्क और हिंदी’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन
‘जन संपर्क और हिंदी’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कुमार सिंह यांनी लिहिलेल्या ‘जन संपर्क और हिंदी’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते काल, मंगळवारी पार पडले. यावेळी मुंबईत राजभवन येथे आयोजित प्रकाशन सोहळ्यात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला, उप-मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कुमार जैन, जनसंपर्क अधिकारी मायकल मॅन्युएल राज आणि प्रकाशक रामकुमार उपस्थित होते. 

याप्रसंगी बोलताना लेखक डॉ. अशोक कुमार सिंह म्हणाले, ‘हे केवळ एक पुस्तक नसून भारतीय रेल्वेला दिलेल्या सेवेचा सारांश आहे. हे पुस्तक अभ्यासक तसेच जन संपर्क व्यावसायिकांसाठी खूप फायदेशीर ठरेल आणि जनसंपर्क क्षेत्रात एक नवीन क्रांती आणेल.’

याप्रसंगी लेखक आणि इतिहासकार राजेंद्र अकलेकर यांनी मत मांडले. ते म्हणाले, ‘जन संपर्क ही परस्परसंवादी प्रक्रिया केवळ लोकांचा अनुभव सुधारण्यास मदत करते असे नाही तर संस्थेला लोकांनी दिलेल्या सूचना आणि अभिप्राय लक्षात घेण्यासही मदत होते. सिंह हे सदैव लोकांमध्ये राहणारे आणि प्रत्येकाला जमेल तशी मदत करणारे जन संपर्क अधिकारी आहेत. ‘जन संपर्क और हिंदी’ हे पुस्तक लोकप्रिय आणि उपयुक्त ठरेल शिवाय जन संपर्क शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नवी दिशा देईल.' अशी अपेक्षा व्यक्त केली. 

एनडीटीव्हीचे सल्लागार संपादक जितेंद्र दीक्षित यांनी या पुस्तकाबद्दल मत व्यक्त केले. ‘या पुस्तकात जनसंपर्क म्हणजे काय, त्याचा उगम, संकल्पना, स्वरूप, व्याप्ती आणि उपयुक्तता आणि त्याची उद्दिष्टे, धोरणे काय आहेत याचे अतिशय प्रभावी वर्णन केले आहे. यासोबतच स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये जनसंपर्क आणि हिंदीचा वापर आणि महत्त्व याचे अचूक विश्लेषण पुस्तकात केले आहे. या पुस्तकात भारतीय रेल्वेच्या वैभवशाली इतिहासाची तसेच भारतीय रेल्वेवरील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यासोबतच भारतीय रेल्वेच्या विकासात सोशल मीडियाच्या योगदानाचेही छान वर्णन केलेले आढळते. जनसंपर्क आणि हिंदी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर अभ्यासकांसाठीही हे पुस्तक वरदान ठरणार आहे.’ असं दीक्षित यांनी लिहिलं आहे. हे पुस्तक मुंबईतील प्रतिष्ठित प्रकाशक आर के पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या