५० खोके, एकदम ओके… ही घोषणा गुन्हा नाही! काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ५० खोके, एकदम ओके… ही घोषणा गुन्हा नाही! काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय?

५० खोके, एकदम ओके… ही घोषणा गुन्हा नाही! काय म्हणाले मुंबई उच्च न्यायालय?

Updated Oct 21, 2024 11:21 AM IST

Bombay High Court: '५० खोके, एकदम ओके' या घोषणांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला.

५० खोके, एकदम ओके’ घोषणा गुन्हा नाही- मुंबई उच्च न्यायालय
५० खोके, एकदम ओके’ घोषणा गुन्हा नाही- मुंबई उच्च न्यायालय (HT_PRINT)

Bombay High Court Hearing: शिवसेनेत फूट पडल्यानंतर चर्चेत आलेल्या '५० खोके, एकदम ओके' या घोषणांविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला. '५० खोके, एकदम ओके' ही घोषणा गुन्हा नाही, अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय, न्यायालयाने एफआयआरही रद्द केला आहे.

शिवसेना शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे गेल्या वर्षी मार्च महिन्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ॲ. शरद माळी आणि अन्य शिवसैनिकांनी (उबाठा) मंत्री सत्तार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर कापूस आणि रिकामे खोके फेकले. तसेच ‘५० खोके, एकदम ओके’ अशा जोरदार घोषणा दिल्या. यानंतर आंदोलनकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. याविरोधात माळी यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. मुंबई उच्च न्यायालयात. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.

दरम्यान, आंदोलनकर्त्यांविरोधात करण्यात आलेली कारवाई म्हणजे शांतता कायम ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केल्याचा पोलिसांनी दावा केला. यावर मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. प्रत्यके आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, अशा शब्दात न्यायालयाने पोलिसांना फटकारले. सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे म्हणत न्यायालयाने ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा गुन्हा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच अब्दुल सत्तार यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्या वकिलांविरोधात नोंदवलेला गुन्हा देखील रद्द केला.

महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. झारखंडमध्ये येत्या १३ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर, महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या दोन्ही राज्यांत २३ नोव्हेंबररोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २५ आणि २९ ऑक्टोबर, अर्जांची छाननी २८ आणि ३० ऑक्टोबर आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख अनुक्रमे ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर आहे.

महायुती विरुद्ध महाविकास आघाडी

राज्यात नुकत्याच झालेल्या ४८ जागांसाठी झालेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केली. पाच वर्षांपूर्वी २३ जिंकलेल्या भाजपला यावेळी ९ जागांवर समाधान मानावे लागले. तर, महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५ तर काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर