बीड गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरूनराज्यातील राजकारण ढवळून निघाले असून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणाचा मुद्दा लावून धरत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्राजक्ता माळी (Prajakta mali), सपना चौधरी व रश्मिका उल्लेख करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून माझी राजकीय कारकीर्द बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी केला होता, यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केला आहे.
सुरेश धस यांनी आज बीडचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला. धनुभाऊ आपले वरती उडत असलेले विमान खाली आणा. कशाचा पालकमंत्री बाबा, कुठून आलीय जत्रा,तुला आम्ही कशाला घेरू? आमच्यासाठी आमच्या लेकराला न्याय देणे महत्त्वाचे आहे. तुमचे राजकारण तुम्हाला लखलाभ असे धस म्हणाले.
बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आ वासून उभा ठाकला असून याचे गँग ऑफ वासेपूर झाले आहे. गुंडांना राजाश्रय मिळत असून उद्योजकांना खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. बीडजवळ कोणी जमीन घेतली ते बघा. परळी बाजार समितीत गाळे बांधले, त्याचे तीन वर्षांपासून उद्घाटन झाले नाही. ते गाळे गायरान जमिनीत उभारले आहेत. आका आता नवीन पॅटर्न वापरत आहेत, त्यांनी तो आम्हाला सांगावा.
आमदार सुरेश धस म्हणाले, अभिनेत्री प्राजक्ताताई माळी आमच्याकडे येतात. प्राजक्ता ताईंचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न आहे. बीड जिल्ह्यात 'आकां' ची १०० ते १५० एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत ३० ते ४० कोटींचे बंधारे बांधून घेतले आहेत. त्यांच्याकडे पाच वर्षात एवढा पैसा आला कुठून? आम्ही परळीत बघत असतो,रश्मिका मंधाना, सपना चौधरी येत असतात. ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे. प्राजक्ता माळीही आमच्याकडे येत असतात. त्यांचा अतिश्य जवळचा पत्ता सापडायचा असेल तर आमचा परळी पॅटर्न बघितला पाहिजे, असे सुरेश धस यांनी म्हटले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत, असा हल्लाबोल मिटकरी यांनी केला होता. मिटकरी यांच्या आरोपाला आमदार धस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.
अमोल मिटकरी फार लहान आहे. माझी त्याला विनंती आहे की, अमोल तू कोणाच्याही नादी लाग पण या रगेलच्या नादी लागू नको. तुला लय महागात पडेल. वडीलकीच्या नात्याने तुला सल्ला देतो, तुझं दुकान कोणीकडेही चालव, पण माझ्याकडे दुकान चालवू नको, असा इशारा सुरेश धस यांनी मिटकरींना दिला आहे.