Mumbai water tax : मुंबईकरांचे पाणी महागणार? भाजप म्हणतो, हे नाही चालणार!
Mumbai Water tax rates : मुंबईतील पाणीपट्टी वाढवण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला भारतीय जनता पक्षानं तीव्र विरोध केला आहे.
Mumbai Water tax rates : महागाईच्या झळांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना मुंबई महापालिकेनं पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या दरवाढीला भारतीय जनता पक्षानं तीव्र विरोध केला आहे. ही वाढ केली जाऊ नये, अशी मागणी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबई महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत. इक्बालसिंह चहल हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. येत्या १६ जूनपासून पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे. लिटरमागे २५ पैसे ते चार रुपयांपर्यंत ही वाढ प्रस्तावित आहे. आमचा या दरवाढीला तीव्र विरोध आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
शेलार यांनी आज चहल यांची भेट घेऊन चर्चा केली. 'एका बाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हातानं द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हातानं काढून घ्यायचं हे चालणार नाही. ही पाणीपट्टी वाढ होण्यापासून रोखावी, अशी मागणी त्यांनी चहल यांच्याकडं केली.
मुंबईला पाण्याची गरज लागू शकते!
मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांना वर्षभरात सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. या सातही धरणांमध्ये सध्या फक्त ११.७६ टक्के म्हणजे १ लाख ७४ हजार दशलक्ष लिटर जलसाठा शिल्लक आहे. पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यास मुंबईला अतिरिक्त पाण्याची गरज भासू शकते. म्हणून राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा व भातसा धरणातून राखीव पाणीसाठा मिळावा, अशी मागणी पालिकेनं सरकारकडे केली होती. राज्य सरकारनं ही मागणी मान्य केली आहे. त्याबद्दल आशिष शेलार यांनी शिंदे सरकारचे आभार मानले.
विभाग