Congress opposed Ujjwal Nikam appointment : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेले व पराभतू झालेले भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम यांची राज्यातील महायुती सरकारनं पुन्हा एकदा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेसनं निकम यांच्या नियुक्तीस तीव्र आक्षेप घेतला आहे. सरकारनं तातडीनं या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.
उज्ज्वल निकम यांनी यापूर्वी देखील विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहिलं आहे. मुंबई बॉम्बस्फोट, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात त्यांनी सरकार पक्षाच्या वतीनं युक्तिवाद केला होता. या खटल्यांमुळं त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. ते सातत्यानं मीडियासमोर येऊन अनेक गोष्टींवर भाष्यही करायचे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबईतून ते वर्षा गायकवाड यांच्या समोर उभे होते. देशभक्त उमेदवार, हिंदुत्ववादी वकील म्हणून त्यांचा प्रचार करण्यात आला होता. मात्र त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर अवघ्या १४ दिवसांत राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारनं त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळं वाद निर्माण झाला आहे.
राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं न्याय व्यवस्थेत आपली माणसं घुसवून पाप केलं आहे. अॅड उज्वल निकम यांनी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुक लढवलेली असताना त्यांची सरकारी वकील पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची सरकारी वकील पदावर नियुक्ती करुन भाजपा सरकार चुकीचा पायंडा पाडत आहे. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारनं त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
संबंधित बातम्या